लग्नाच्या चौदाव्या दिवशी नवरदेव पोलीस कोठडीत!

By Admin | Updated: July 30, 2014 23:17 IST2014-07-30T23:14:29+5:302014-07-30T23:17:52+5:30

मजुरी केली असती तरी साथ दिली असती

Nawardev police custody on the 14th day of marriage! | लग्नाच्या चौदाव्या दिवशी नवरदेव पोलीस कोठडीत!

लग्नाच्या चौदाव्या दिवशी नवरदेव पोलीस कोठडीत!

दत्ता यादव ल्ल सातारा
भावी आयुष्याची स्वप्ने रंगवून नववधू घरात आली. आप्त-स्वकीयांची ओळख अद्याप व्हायची होती. तत्पूर्वीच तिच्या नशिबाचे फासे फिरले. आपला भावी जोडीदार चक्क एक अट्टल चोरटा आहे आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडालाय, असं ज्यावेळी नववधूला लग्नाच्या चौदाव्या दिवशी समजलं, तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली.
स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी कोरेगाव तालुक्यातील घरफोडी आणि दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद केली. या टोळीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
रवींद्र पेठेकर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार. रवींद्रचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंत झाले आहे. त्याचे आई-वडील पूर्वी मेढा येथे वास्तव्यास होते. मात्र, मोलमजुरीच्या निमित्ताने त्यांनी कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे आश्रय घेतला. कष्ट करण्यापेक्षा कुमठे फाट्यावर उनाडक्या करत रवींद्र दिवस घालवू लागला. त्यावेळी त्याची संतोष सणस, नीलेश जाधव, बबन जाधव (रा. जांब खुर्द, ता. कोरेगाव) यांच्याशी ओळख झाली. हे तिघेही बेफिकीर, दिवसभर कुमठे चौकात दंगामस्ती करत आला दिवस घालवायचे. अशा मनोवृत्तीत वाढलेल्या या चौघांनी एकत्र बसून झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारला. टोळीची सूत्रे रवींद्रने स्वत:च्या हातात घेतली. पहिल्या चोरीमध्ये त्यांनी बंद घर फोडले. त्यामध्ये त्यांना तब्बल पन्नास हजार रुपये मिळाले.
कमी वेळात एवढे पैसे मिळाल्याने चौघांचेही डोळे विस्फारले. त्या दिवसांपासून त्यांनी चोरीचा सपाटाच लावला होता. कोरेगाव तालुक्यामध्ये घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची नाचक्की झाली. मात्र, एका खबऱ्याकडून पोलिसांना या नव्या टोळीचा छडा लागला. २००९ मध्ये पहिल्यांदाच रवींद्र पेठेकरला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून ९ घरफोड्या उघडकीस आल्या होत्या. काही महिने कारागृहात व्यतीत केल्यानंतर पुन्हा तो जामिनावर सुटला. मात्र, काही महिन्यांनंतर परत त्याने पहिलाच उद्योग सुरू केला. पूर्वीच्या मित्रांना जवळ करून त्याने मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणाहून दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या टीमने अखेर या टोळीचा पर्दाफाश केला.
मजुरी केली असती तरी साथ दिली असती
रवींद्र हा बोलघेवडा असल्यामुळे त्याच्या नातेवाइकांमध्येही तो एकप्रकरे मोहरक्या म्हणूनच वावरत होता. नात्यातीलच एका मुलीशी त्याने १३ जुलैला पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये लग्न केले. ‘पुण्यातील एका प्रसिद्ध कंपनीत मी नोकरी करतो,’ असं त्याने पत्नीला सांगितलं होतं. कामानिमित्त चार ते पाच दिवस तो बाहेरच असायचा. मात्र, दोन दिवसांपूर्वी रवींद्र आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही बातमी त्याच्या पत्नीला समजली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. भावी आयुष्याची सुरूवात करण्यापुर्वीच पतीने दगा दिला. ‘रात्री कंपनीत कामाला जातोय,’ असे सांगण्याऱ्या पतीचा खरा चेहरा समोर आल्याने पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. मोलमजुरी करून त्याने कुटुंब चालविलं असतं तर मी त्याच्यासोबत आख्खं आयुष्य काढलं असतं. मात्र त्याने गैरमार्ग पत्करून स्वत:च्या आणि माझ्याही आयुष्याचं वाटोळे केलं,’ अशी संतप्त भावना रवींद्रच्या पत्नीने पोलिसांजवळ बोलून दाखविली.

Web Title: Nawardev police custody on the 14th day of marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.