उद्योगासाठी नैसर्गिक संपत्तीचा गळा घोटला !
By Admin | Updated: June 20, 2016 00:30 IST2016-06-20T00:30:06+5:302016-06-20T00:30:06+5:30
खंडाळा तालुका : पर्यावरणाचा ऱ्हास; औद्योगिकीकरणाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड, टेकड्या उद्ध्वस्त

उद्योगासाठी नैसर्गिक संपत्तीचा गळा घोटला !
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय विस्तारीत झालेला आहे. मात्र या उद्योग उभारणीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा व पर्यावरणाचा गळा घोटला जात असल्याचे विदारक चित्र तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.
नव्या औद्योगिक धोरणानुसार महामार्गालगत आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा तालुक्याला कारखानदारांनी पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे शेकडो कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. तर अनेक कंपन्यांची कामे सुरू आहेत.
कंपनी उभारण्यासाठी घेतलेल्या जमीन क्षेत्रातील सपाटीकरण करताना वृक्षसंपदेला कुऱ्हाडीचा घाव घातला जातोय. नैसर्गिक टेकड्या बेमालूमपणे भुईसपाट केल्या जात आहे. एवढेच नव्हे तर नैसर्गिक ओढे -नाले सुद्धा नेस्तनाबूत होत आहेत. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसणार आहे. कंपन्यांनी ओढ्यातूनच कंपाऊंड बांधून त्याखालून ओढ्याचे पाणी काढून दिले आहे. ऐन पावसाळ्यात येणारे पाणी ओढा पात्र संपुष्टात आल्याने शेतीपिकातून जाण्याची भीती आहे.
अनेक कंपनी मालकांनी अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली टेकड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तर प्रचंड प्रमाणात वृक्षतोडही केली आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने डोळेझाक करून गांधारीची भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळते.
वास्तविक नव्या धोरणानुसार कंपनी उभारताना घेतलेल्या जमिनीत सुमारे ३३ टक्के भागावर वृक्षारोपण करणे बंधनकारक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. परंतु दिवसा ढवळ्या प्रशासनादेखत कायदाही बासनात गुंडाळून मागेपुढे पाहिले जात नाही. तरीही प्रशासन गप्प का ? अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. एरव्ही शेतकऱ्यांने स्वत:च्या जमिनीत माती उकरली तरी दंड करणारे महसूल प्रशासनाची कंपन्यांबाबत ही भूमिका कशासाठी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी)
खंडाळा तालुक्यात उद्योग वाढत आहेत. ही बाब चांगली असली तरी त्याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणे योग्य नाही. कायद्याचे पालन करून कंपन्यांनी कामे केली पाहिजेत. यावर प्रशासन लक्ष देणार नसेल तर समाजहित जोपासणारा पक्ष म्हणून शिवसेना त्यावर आवाज उठवेल.
- अजित यादव, तालुकाप्रमुख, युवा शिवसेना खंडाळा
कंपन्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांधिलकी जोपासली पाहिज. नैसर्गिक प्रवाह बंद करून शेतकऱ्यांवर घाला घालू नये. तालुक्यातील सर्व कंपन्यांनी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
- संतोष देशमुख,
सामाजिक कार्यकर्ते