झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’
By Admin | Updated: June 1, 2016 00:58 IST2016-05-31T23:37:47+5:302016-06-01T00:58:24+5:30
वडूज नगरपंचायतीचे परिणाम : गट-गण पुनर्रचनेची इच्छुकांना प्रतीक्षा; आपण कोठे जाणार, याबाबत नागरिकांमध्ये लावल्या जातायत पैजा

झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’
रशीद शेख -- औंध --वडूजला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर वडूज जिल्हा परिषद गट रद्द होऊन सिद्धेश्वर कुरोली गट होणार, मग त्यामध्ये वडूजचे कमी झालेले मतदान कोठे भरून काढणार? त्यासाठी लगतच औंध गटात काही बदल होऊन पुनर्रचना होणार का? अशा अनेक प्रश्नांमुळे झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’ झाली आहे. याची खुमासदार चर्चाही सध्या औंध गटात सुरु झाली आहे.येत्या काही महिन्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येऊन ठेपली आहे. इच्छुकांनी प्रचारास सुरवात केली होती. त्यानिमित्ताने जेवणावळी, लग्न, पूजा, युवकांचे वाढदिवस अशा कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावत असल्याचे पाहावयास मिळत होते; परंतु वडूज नगरपंचायत होणार, अशी काही दिवसांपूर्वी चर्चा सुरु असतानाच नगरपंचायत झाली अशी अधिसूचना जारी झाली व औंध आणि परिसरातील इच्छुक, कार्यकर्ते याच्या पैजा सुरु झाल्या आहेत. अगोदर आपण आपल्याच गटात आहे का बघा, मगच प्रचार करा, खर्च करा, असे सल्ले एकमेकांना दिले जात आहेत. राष्ट्रवादीचे राजेंद्र माने, हणमंतराव शिंदे, उपसभापती गणेश शिंदे, शिवसेनेचे वसंतराव गोसावी, भाजपचे राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे कळंबीचे सचिन घाडगे, भोसरेचे महादेव जाधव, लोणीचे ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी फडतरे, लांडेवाडीचे अशोक सूर्यवंशी, जायगावच्या जिल्हा परिषद सदस्या सुंनदा राऊत, पळशीचे प्रकाश घार्गे, येळीवचे शिवाजी सर्वगोड, नांदोशीचे नवल थोरात, शिरसवडीचे विलास इंगळे, माजी सभापती सोनाली खैरमोडे यांच्यासह अनेकांनी अंतर्गत तयारी सुरु केली आहे. यातील काहींची पक्ष आदेशानुसार काम करण्याची तयारी आहे, तर काहींनी तिकीट मिळो अथवा ना मिळो आम्ही आहोतच फक्त आरक्षण पडण्याची वाट पाहतोय, असेही बोलून दाखविले. औंध गटातील दक्षिणेकडील काही गावे पुसेसावळी गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे सचिन घाडगे, बंडा मुलाणी यांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका तर औंध गटातील पळशी नजीकच्या गोपूज, गोसाव्याची वाडी गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील खटाव गटातील विसापूर औंधमध्ये समाविष्ट होणार का, याबाबतही चर्चा सुरु आहे.जिल्हा परिषदेच्या रेसमध्ये असणारे विद्यमान सरपंच सागरभाऊ साळुंखे यांचे औंधचे वाढते दौरे बरेच काही सांगून जातात. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांची गोची होणार आहे.नगरपंचायतीच्या घोषणेमुळे सर्वच गटातील वातावरण ढवळून निघणार आहे. औंध गट याला अपवाद नाही. आता गट, गणांच्या पुनर्रचनेची इच्छुकांना, कार्यकत्यांना, मतदारांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.