‘मुंडें’च्या अकाली जाण्याने अनेकांची गोची!
By Admin | Updated: June 17, 2014 00:46 IST2014-06-17T00:34:05+5:302014-06-17T00:46:47+5:30
सातारा जिल्हा : म्हणे स्वप्नातले इमले झाले जमीनदोस्त

‘मुंडें’च्या अकाली जाण्याने अनेकांची गोची!
प्रमोद सुकरे, कऱ्हाड : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याचं दु:ख अवघ्या महाराष्ट्राला झालं; पण केंद्रात भाजपचं सरकार आल्यावर जिल्ह्यातील अनेकांनी आमदार बनण्याचे स्वप्नात बांधलेले इमले जमीनदोस्त होऊन त्यांची राजकीय गोची झाल्याचीही चर्चा आहे.
भाजपला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम राज्यात गोपीनाथ मुंडेंनी केले. सातारा जिल्ह्यावर तर त्यांचे विशेष प्रेम होते. म्हणून तर बहुजन समाजाचा चेहरा हाच भाजपाचा चेहरा आहे, हे लोकांच्या गळी उतरविण्यासाठी त्यांनी राज्यात युती सरकार असताना मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असणाऱ्या उदयनराजेंना भाजपात प्रवेश देऊन महसूल राज्य मंत्रिपद बहाल केलं. त्या दोन्ही कुटुंबातील प्रेमाचे संबंध त्या वेळीपासून काल-परवा लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंडे कुटुंबीयांनी शिखर शिंगणापूरमध्ये घेतलेल्या दर्शनापर्यंत दिसून येतातच!
दुष्काळी तालुक्याच्या पाणीप्रश्नावर लढणाऱ्या डॉ. दिलीप येळगावकरांनाही मुंडे यांनीच शिवसेनेकडून मतदारसंघ बदलून घेत चक्क पक्षाची उमेदवारी दिली अन् जिल्ह्यात भाजपचा पहिला आमदारही झाला. केंद्रात भाजपचं सरकार आल्यावर ‘दिलीप तू भेटायला ये’ असा मुंडेंचा फोन आल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष येळगावकरांनीच काही दिवसापूर्वीच सांगितले. यावरुन केंद्रात सत्ता आल्यानंतर राज्यात सत्ता बदल करण्यासाठी मुंडेंच्यातील कुशल संघटक कसा सक्रिय होता, हे ध्यानात येते.
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यावर जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या. अलीकडच्या काळात तर राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळी जास्त दिसून येतात. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून भागाचा विकास करण्यासाठी अनेकजण मुंडेंकडे मोठ्या अपेक्षेने पाहात होते. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक तरुणांनी तर मुंडेंच्या माध्यमातून कमळ फुलविण्याची जोरदार तयारी सुरु केली होती.
भाजपच्या पहिल्या १३ दिवसांच्या राजवटीत कऱ्हाड तालुक्यातील एका साखर कारखान्याला मंजुरी मिळाली होती. त्याचे प्रमुख ‘रयत’ने आग्रह धरला, तर वेळच आली तर हातात ‘कमळ’ धरले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
‘हरणाई’च्या गतीने माणचं ‘रण’ ‘जित’ण्यासाठी निघालेला एक तरुणही कमळाच्या वाटेवर आहे म्हणे! राष्ट्रवादीच्या बी. सी., ओ. बी. सी. सेलचा एक राज्यस्तरीय पदाधिकारी ‘कमळा’च्या फुलांची माळ गुंफायची म्हणतोय. हा ‘माळी’ उद्या कमळाच्या बागेत फिरला तर नवल वाटायला नको. माणचा ही एक नेता या कमळाच्या प्रेमात पडतोय म्हणे! तर भुर्इंजचा एक ‘मदन’ भ्रमरही कमळाभोवती पिंगा घालतोय,
अशी चर्चा आहे. परंतु मुंडेंच्या अनपेक्षितपणे जाण्याने त्यांची गोची झालीय म्हणे.