मुंडेंनी दिले होते ‘आमंत्रण’
By Admin | Updated: June 4, 2014 00:11 IST2014-06-04T00:11:25+5:302014-06-04T00:11:39+5:30
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष : मोबाईलवरून साधला होता संपर्क

मुंडेंनी दिले होते ‘आमंत्रण’
सातारा : चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी ‘दिलीप, भेटायला ये..’ असा निरोप धाडला होता. मात्र, येळगावकरांनी ‘कार्यकर्त्यांशी चर्चा करतो,’ असे सांगत भेट घेण्याचे टाळले होते. अखेर ही भेट अपूरीच राहिली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अन्य नेत्यांनाही भाजपमध्ये कसे आणता येईल, यासाठीही मुंडे यांनी जिल्ह्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या. सातारा जिल्हा आणि भारतीय जनता पार्टीचा विचार करता गोपीनाथ मुंडे यांचे डॉ. दिलीपराव येळगावकर आणि कांताताई नलावडे यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध राहिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांना भाजपमधील वरिष्ठ लॉबीने अनेकदा त्रास दिला. त्याची खंत त्यांनी अनेकदा जवळ असणार्या कार्यकर्त्यांशी बोलून दाखविली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मानणारे तसेच वंचित घटकांसाठी काम करणारे प्रमुख कार्यकर्ते भाजपच्या प्रवाहात आणण्यामध्ये मुंडेंचा मोठा वाटा आहे. सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे, संभाजी पवार त्याचबरोबर नुकतेच खासदार झालेले संजय पाटील ही सारी मंडळी मुंडेंच्या शब्दाखातर भाजपमध्ये आली. १९९८-९९ च्या दरम्यान, डॉ. दिलीपराव येळगावकर भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना मायणी येथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ही बाब ज्यावेळी मुंडेना कळाली त्यावेळी ते तत्काळ मायणीमध्ये आले होते. येथे त्यांनी पोलिसांना ज्यापध्दतीने सुनावले, तो किस्सा आजही अनेकांना ज्ञात आहे. १९९८ मध्ये सातारा येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्याचे नियोजन पाहून मुंडे स्वत: हरखून गेले होते. गोपीनाथ मुंडे यांना भाजपमध्ये अनेकदा त्रास झाला. त्या-त्यावेळी येळगावकरांनी पत्रक काढून मुंडे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. डॉ. दिलीपराव येळगावकर आणि आ. सुरेश खाडे यांनी पत्रक काढून ‘गोपीनाथ मुंडे भाजपमध्येच राहायला हवेत, अन्यथा महाराष्ट्रात भाजपचे काही खरे नाही’ अशा आशयाचे पत्रक काढून मुंडे यांचे समर्थन केले होते. काही वर्षांपूर्वी गडकरी अध्यक्ष असताना मुंडे यांचे खच्चीकरण करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळीही मुंडे यांनी स्वत: येळगावकरांशी संवाद साधून आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली होती. येळगावकर यांना ज्यावेळी मुंडे यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी ते आपल्या कुटुंबासह तत्काळ मुंबईकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)