मुमताज चौधरी हाजीर हो..!
By Admin | Updated: June 19, 2014 00:46 IST2014-06-19T00:45:26+5:302014-06-19T00:46:09+5:30
सातारा जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम नोटीस : दहा दिवसांत म्हणणे मांडा अन्यथा एकतर्फी निर्णय

मुमताज चौधरी हाजीर हो..!
सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगरसेविका मुमताज लतिफ चौधरी यांना वारंवार म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी आपले म्हणणे सादर केलेले नाही. परिणामी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी बुधवारी अंतिम नोटीस काढून दहा दिवसांच्या आत आपले म्हणणे सादर करण्यास बजावले आहे. दरम्यान, यानंतरही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाहीतर आपल्याबाबतीत एकतर्फी निर्णय देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात बजावले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात पाचगणी, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड नगरपालिकेच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या सुणावनी सुनावणी सुरू आहे. या सुनावणीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
मुमताज लतीफ चौधरी या सातारा पालिकेच्या नगरसेविका असून त्यांनी त्यांचे वजन वापरून जावयाच्या नावावर घंटागाडीचा ठेका घेतला असल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशा आशयाची याचिका माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दि. २३ जुलै २0१३ जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे दाखल केली आहे. विशेष म्हणजे हे ठराव संमत करत असताना स्वत: मुमताज चौधरी पालिकेच्या बैठकीला हजर होत्या. ही बाब गंभीर असल्याचेही मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्पष्ट केले आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांनाही मोरे यांनी याप्रकरणी प्रतिवादी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची दोनवेळा सुनावणी झाली. दोन्हीवेळी मुमताज चौधरी यांचे वकील हजर राहिले असलेतरी त्यांनी म्हणणे मांडलेले नाही. विशेष म्हणजे म्हणणे दाखल करण्यासाठी चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दि. ६ डिसेंबर २0१३ रोजी मुदतही मागितली होती. तरीही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मुमताज चौधरी यांना दहा दिवसांच्या आत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीतही म्हणणे सादर नाही केले तर तक्रारदाराचा अर्ज, उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी निर्णय देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या अंतिम पत्रामुळे सातारा पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून त्याकडे अनेकांच्या नजरा आहेत. (प्रतिनिधी)