डोंगर माथ्यावर अन् पायथ्याला आंब्याची बाग!
By Admin | Updated: May 23, 2014 22:57 IST2014-05-23T22:36:17+5:302014-05-23T22:57:06+5:30
पाटण तालुका : सेंद्रिय हापूसला बाजार पेठेत मोठी मागणी

डोंगर माथ्यावर अन् पायथ्याला आंब्याची बाग!
सातारा : फळांचा राजा हापूस अर्थात रत्नागिरीचा हापूस सर्वच बाजारपेठेत वर्चस्व ठेवून आहे. अगदी परेदशातही! परंतु रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या या फळाला परदेशातून बंदी घालण्यात आली. अगदी स्थानिक बाजारातही चोखंदळ ग्राहक अशा फळाकडे दुर्लक्ष करू लागला. असे असतानाच पाटण खोर्यात डोंगरमाथ्यावर अन् पायथ्याला सूर्यकांत ऊर्फ राजू काळे या तरुणाने जिद्द आणि खडतर परिश्रमाच्या जोरावर आंब्याची बाग केली. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या हापूसला आता बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा मोठा कल शेतकर्यांच्यात वाढू लागला आहे. पाटण तालुक्यातील काळगावचा तरुण राजू काळे हा मूळचा फोटोग्राफर. त्याने अत्यंत दुर्गम अशा डोंगरमाथ्यावर असणार्या आपल्या पाच एकरांत १९९६ मध्ये सर्वप्रथम आंब्यांची बाग केली. राज्य शासनाने या बागेसाठी त्याला हेक्टरी १८ हजारांची मदत केली.परंतु जंगलाला वणवा लागला आणि तीन वर्षांतच ही बाग जळून खाक झाली. आपले वृद्ध माता-पिता आणि पत्नी छाया-मीना यांच्या साह्याने त्यांने खचून न जाता पुन्हा बाग उभी केली. दापोली कृषी विद्यापीठातून हापूस, केसर, लंगडा, वनराज आणि तोतापुरीची झाडे आणून पुन्हा नव्या जोमाने बाग केली. या डोंगरमाथ्यावरील आंब्याच्या झाडांना अगदी खांद्यावरून हंडा वाहून पाणी घातले. त्यानंतर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रशिक्षणातून मटका सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली. या बागेत आवळा आणि काजूची झाडेही त्यांनी लावली आहेत. पाच वर्षांनंतर प्रत्यक्ष उत्पन्नाला सुरुवात झाली. हा आंबा पारंपरिक पद्धतीने भाताच्या पिंजाराचा वापर करून अढी घालून पिकविण्यात येतो. यानंतर मागील वर्षापासून त्याने कºहाड तालुक्यातील तुळसण येथील ३०० झाडांची आंब्यांची बाग वार्षिक करारावर घेतली. या बागेतही जीवापाड मेहनतीने निगा राखत मागील वर्षापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. हा सर्व आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकविला जातो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी राजूला वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यामध्ये सघन पद्धतीने आंबा लागवड घेतल्यास प्रतिएकर मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य होते. त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड निर्मूलन, छाटणीची जोड, मोहर संरक्षण याबाबत राजूला ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. त्याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या आंब्याला शेतकरी ते थेट ग्राहक याजनेतून चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी) अडीच लाखांचे उत्पन्न गतवर्षी पुणे येथे तर यंदा सातार्यातील प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद आणि सिंचन भवन येथे थेट ग्राहक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरवर्षी दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न राजूला मिळत आहे.