मोरणा-गुरेघर कालव्याच्या कामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:11+5:302021-03-08T04:36:11+5:30
पाटण : तालुक्यासह मोरणा विभागातील शेतकरी आणि जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मोरणा-गुरेघर प्रकल्प कालव्यांच्या कामांना सतत ...

मोरणा-गुरेघर कालव्याच्या कामांना ‘ब्रेक’
पाटण : तालुक्यासह मोरणा विभागातील शेतकरी आणि जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मोरणा-गुरेघर प्रकल्प कालव्यांच्या कामांना सतत ‘ब्रेक’ लागत असून, सध्या तर कालव्याचे काम पाहणारे साहाय्यक अभियंताच रजेवर गेले आहेत. कालव्याची कामे करणारे दोन्ही ठेकेदारही घरी गेले असून कालव्याची कामे वाऱ्यावर पडली आहेत.
पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. प्रकल्पात लक्षणीय पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून डावा आणि उजवा असे दोन कालवे दोन्ही बाजूंनी काढून शेतकऱ्यांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करणे असे नियोजन आहे. या नियोजनाप्रमाणे गत पाच-सहा वर्षांपासून कालव्यांची कामे सुरूही झाली. मात्र दरवर्षी कालव्यांच्या कामाला साडेसाती लागून कामे अर्धवट पडत आहेत. याला केवळ बेजबाबदार अधिकारी आणि निष्काळजी ठेकेदार कारणीभूत आहेत. प्रकल्पाच्या कालव्यांची कामे जलद गतीने पूर्ण व्हावीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी कार्यक्षम अधिकारी नेमून ठेकेदारांच्या मागे ससेमिरा लावण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. बरेच अधिकारी बदलून गेले. अधिकाऱ्यांनी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामाचे भिजत घोंगडे कायम आहे.
सध्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम आंब्रग गावापर्यंत पोहोचले असून याच गावामध्ये अनेक दिवस हे काम रखडले आहे. कुठेतरी एखादा पोकलॅन आणून खोदकाम करायचे आणि दिवस घालवायचा, असा टाईमपास ठेकेदाराकडून सुरू आहे. तसेच दुसरीकडे उजव्या कालव्याचे काम मोरगिरी आणि माणगाव या दोन्ही गावांच्या दरम्यान सुरू होते. तेथेही असाच प्रकार सुरू आहे. कालव्याच्या कामाची छोटी-मोठी इतर कामे करणारी मजुरांची टोळी गावाजवळ तळ ठोकून आहे. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार जागेवर नसल्यामुळे या मजुरांना हाताला काम मिळेना. काम बंद असल्यामुळे मजुरांची टोळी काही करू शकत नाही.
- चौकट
गृहराज्यमंत्र्यांची पकड ढिली झाली का?
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका आणि तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्याला कामे पूर्ण करण्यासाठी तगादा लावण्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा हातखंडा आहे. मात्र, गत दोन-तीन महिन्यांपासून शंभुराज देसाई यांनी लक्ष कमी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
- चौकट
सध्या मी रजेवर आहे. त्यामुळे मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यांची कामे बंद आहेत की चालू, याबाबत मला सांगता येणार नाही. माझ्याकडील कार्यभार कोणाकडेही दिलेला नाही. मी रजेवर असल्यामुळे प्रकल्पाच्या कालव्यांबाबत मी कसलीच माहिती देऊ शकत नाही.
- एस. एस. खरात
साहाय्यक अभियंता, कृष्णा खोरे विकास महामंडळ
- चौकट
प्रकल्पाचा लेखाजोखा
कामाला सुरुवात : १९९५-९६
एकूण पाणीसाठा : १.५ टीएमसी
बाधित गावे : १२
लाभक्षेत्र : कऱ्हाड, पाटण
लाभक्षेत्रातील गावे : ४५
कालव्यांची संख्या : २
वीजनिर्मिती : ०.५ मेगावॅट
फोटो : ०७केआरडी०१
कॅप्शन : मोरणा-गुरेघर प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो. मात्र, कालव्याची कामे रखडल्यामुळे या पाण्याचा लाभक्षेत्रातील गावांना काहीच फायदा होत नाही.