मान्सूनचा पाऊस चक्क पूर्वेकडून जिल्ह्यात
By Admin | Updated: June 20, 2016 00:33 IST2016-06-20T00:33:40+5:302016-06-20T00:33:40+5:30
नाले-बंधारे तुडुंब : माण, खटाव, फलटणला जोरदार हजेरी, अनेक ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित, ठिकठिकाणी झाडे पडली

मान्सूनचा पाऊस चक्क पूर्वेकडून जिल्ह्यात
सातारा : केरळनंतर, विदर्भमार्गे राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. रविवारी हा पाऊस माण, खटाव, फलटण तालुक्यात पडत सायंकाळी साताऱ्यात दाखल झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सायंकाळी सातारा शहरात रिमझिम पाऊस झाला. दुष्काळी माण, खटाव तालुक्यांत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वाहनांवर झाड पडल्याने नुकसान झाले. दरम्यान, महाबळेश्वरला संततधार सुरू होती.
मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. अनेक गावांतील बंधारे भरले, ओढ्यांना पाणी वाहिले. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. आता पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंदवले : गोंदवले व परिसरातही पाऊस झाला. सर्व रस्त्यावरून पाणी वाहत होते. हा पाऊस पेरणीस उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे.
म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड शहर व आजूबाजूच्या गावांमध्येही पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
महाबळेश्वरमध्ये दिवसभर संततधार...
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे पावसास सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपासून पावसाची संततधार होती. शनिवार-रविवार असल्यामुळे पुणे, मुबंईच्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. पर्यटकांच्या वाहनांची वेण्णा लेक रोडवर लाबंचलांब रांगा लागलेल्या होत्या. महाबळेश्वरात पाऊस व धुके पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक बाजरपेठमधील गरमागरम मक्याची कणसे खाताना दिसत आहेत.
पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा...
खटाव : खटाव व परिसरात रविवारी झालेल्या पावसामुळे ग्रामस्थ व शेतकरी सुखावले आहेत. चालूवर्षी पाऊस वेळेत सुरू होणार या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र पावसाने ओढ दिली. त्यामुळे सर्वजण चिंतेत असतानाच रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. या पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली आहे. या पावसामुळे आता पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
औंध परिसरात सर्वत्र पाणीच पाणी...
औंध : रविवारी खटाव तालुक्यातील औंध परिसरात धुव्वाधार पाऊस झाला. या पावसाने परिसरास झोडपून काढले. दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने औंध, नांदोशी, त्रिमली, खबालवाडी, गणेशवाडी, जायगाव व अन्य भागांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
मागील तीन-चार दिवसांपासून हवेत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. तसेच ढगाळ वातावरणही होते. रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने शेतांमध्ये, बंधारे, ओढ्या-नाल्यातून पाणी खळाळून वाहिले.
या पावसाने खरिपाच्या पेरणीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही गावांमध्ये पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आणखी दमदार पाऊस झाला तर औंध परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाईही आटोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाने वेळेवर सुरुवात केल्याने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावेळी बंधाऱ्यात काहीप्रमाणात साठा झाला होता. रविवारचा पाऊसही फायदेशीर आहे. (वार्ताहर)