एकट्याला गाठून वानर करतोय हल्ला
By Admin | Updated: August 5, 2014 23:42 IST2014-08-05T21:20:19+5:302014-08-05T23:42:39+5:30
यवतेश्वर : अनेक जखमी; ग्रामसभेत करणार म्हणे उपाययोजनेचा ठराव

एकट्याला गाठून वानर करतोय हल्ला
बामणोली : यवतेश्वर गावात एका वानराने आठवडाभरात उच्छाद मांडला आहे. या वानराने पाच ते सहा व्यक्तींना चावा घेऊन जखमी केले आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासंदर्भात म्हणे, उपाययोजना करण्यासंदर्भात ठराव ग्रामसभेत मांडणार आहेत.याबाबत माहिती अशी की, यवतेश्वर, कास पठारावर प्रचंड झाडी आहेत. त्यामुळे या परिसरात वन्य जीवांबरोबरच वानरांची संख्याही मोठी आहे. श्रावण महिना असल्याने येथील यवतेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक या वानरांना खायला देत असतात. त्यामुळे हे वानरांमध्ये माणसांमध्ये वावरत आहे.येवतेश्वर गावातील एक वानर आठवड्यापासून माणसांच्या अंगावर उडी मारुन हाताला चावा घेत आहे. दोन दिवसांपूर्वी जोतिराम भणगे (वय ६२) यांच्या डाव्या पोटरीचा चावा घेतला होता.
यामध्ये भणगे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले होते. यामध्ये त्यांच्या पायाला सात टाके पडले आहेत. हे वानर यवतेश्वरमधील शंकर मंदिर परिसरातच वावरत असून सकाळीच गावातील झाडांवर येऊन बसत आहे. झाडीत बसून राहिलेल्या माकडाचा अंदाज येत नाही, मात्र एकट्या माणसांवर अचानक हल्ला चढवत असते. यामुळे परिसरातील वयोवृद्ध, जनावरे चरायला घेऊन जाणारे गुराखींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात पडत असलेल्या पावसामुळे लहान मोठे धबधबे पाण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्यामध्येही वानराची दहशत निर्माण झाली आहे. या वानराचा बंदोबस्त करावा, यासाठी वनविभागाकडे लेखी तक्रारही देऊनही कोणतीही पावले उचलली नाहीत. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थ ठराव करुन संबंधित वानराचा बंदोबस्त करण्यासंदर्भात ठराव करणार आहेत. (वार्ताहर)
श्रावण सोमवारी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या ठिकाणी लहानमोठे धबधबे असल्याने लोक थांबत असतात. मात्र, वानरांचा त्रास होत असल्याने भाविकांमध्येही भितीचे सावट पसरले आहे.