अर्थव्यवस्था ढासळत असताना केंद्राकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST2021-02-23T04:57:28+5:302021-02-23T04:57:28+5:30
औंध : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणी येत आहेत. विनाअनुदानित शाळा, संस्थेच्या इमारतींची वीजबिले, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींवर लवकरच निर्णय घेतला ...

अर्थव्यवस्था ढासळत असताना केंद्राकडून दिशाभूल
औंध : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणी येत आहेत. विनाअनुदानित शाळा, संस्थेच्या इमारतींची वीजबिले, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींवर लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अर्थव्यवस्था ढासळत असताना आकडेवारी बोगस देऊन दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकार करत आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
खटाव तालुक्यातील येळीव येथील हरणाई सहकारी सूतगिरणीवर शिक्षक संस्थाचालक, शिक्षक मतदार आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अजितराव चिखलीकर, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अशोक गोडसे, राजेंद्र शेलार, डॉ. विवेक देशमुख, डॉ. महेश गुरव, संजीव साळुंखे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. आपली स्पर्धा परदेशी तंत्रज्ञानाशी असल्याने शिक्षण क्षेत्रावर प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे.’
आमदार आसगावकर म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिक्षक आणि संस्थाचालक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. जुन्या पेन्शन योजनेत असणाऱ्या त्रुटी दूर केल्या आहेत.’
रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘एकदिलाने मिळून सर्वांनी काम केल्याने पुणे विभाग मतदारसंघात घवघवीत यश मिळाले आहे. यामध्ये माण-खटावच्या मतदारांचा मोठा वाटा आहे.’
यावेळी प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे, सुरेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी राजाभाऊ देशमुख, राजू मुलाणी, भरत जाधव, परेश जाधव, विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, टिल्लू बागवान, सत्यवान कांबळे, तानाजी बागल, गोविंद भंडारे, सचिन घाडगे, प्रमोद राऊत, राजेंद्र जगदाळे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, संस्थाचालक उपस्थित होते.
चौकट :
उरमोडीच्या पाण्याचे श्रेय केवळ पृथ्वीराज बाबांचेच
‘कोणीही उठसूट उरमोडीच्या पाण्याचे श्रेय घेत आहे. हे पाणी दुष्काळी शिवारात फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच आले आहे. त्यामुळे इतरांनी श्रेय घेण्याचा खटाटोप करू नये, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
फोटो
येळीव येथील हरणाई सूतगिरणीवर आयोजित शिक्षक संस्थाचालक, शिक्षकांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, रणजितसिंह देशमुख, प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे, सुरेश जाधव उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)