मंत्रिपदासाठी भीक मागणार नाही
By Admin | Updated: April 29, 2016 00:29 IST2016-04-28T21:01:12+5:302016-04-29T00:29:45+5:30
सदाभाऊ खोत : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लाल दिव्याची गरज नाही

मंत्रिपदासाठी भीक मागणार नाही
औंध : ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लाल दिव्याची गरज नाही, छातीवरील बिल्ला हाच मोठा लाल दिवा आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी शासनाकडे भीक मागणार नाही,’ असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.
औंध येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख संजय भगत, तानाजी देशमुख, अनिल पवार, दत्तात्रय घार्गे, नितीन शिंदे, विनोद खराडे, महादेव जाधव, संतोष येवले, नामदेव पाटील, गणेश येवले, सागर जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जिथे दुर्लक्ष करेल, तिथे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. अद्यापही काही कारखाने एफआरपी रक्कम देण्याबाबत टाळाटाळ करत आहेत; मात्र ती रक्कम त्यांना द्यावीच लागेल. मंत्रिपदाबाबत सरकार घटक पक्षांना वंचित ठेवत आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडी शासनाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी ठाम भूमिका घेतली.
आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला मंत्रिपदाची गरज नाही व त्याचे प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले तर आम्ही गप्प बसणार नाही,’ असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)