ठसे उमटले...गूढ उकलले !
By Admin | Updated: June 20, 2016 00:28 IST2016-06-20T00:28:20+5:302016-06-20T00:28:20+5:30
दीड वर्षात पाच घरफोड्या, एक खून उघडकीस : शातीर चोरटे बनतायत क्राईम ब्रँचची डोकेदुखी

ठसे उमटले...गूढ उकलले !
दत्ता यादव ल्ल सातारा
कितीही शातीर गुन्हेगार असला तरी गुन्हा केल्यानंतर तो पुरावा मागे सोडून जातोच, असे म्हटले जाते; मात्र अलीकडच्या काळामध्ये हायटेक गुन्हेगार सक्रिय झाल्यामुळे पोलिसांना मागे पुरावे मिळेनासे झाले आहेत; परंतु सातारा पोलिसांनी यावर मात करून तब्बल पाच घरफोड्या आणि एक खून फिंगर प्रिंटच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. चोरटे शातीर होत चालले असताना पोलिसांनी कौशल्याने केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
पोलिस दलामध्ये अजूनही तपासाच्या अनुषंगाने पारंपरिक पद्धती अवलंबल्या जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारापर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड बनत आहे. पूर्वी ‘डॉग स्कॉड आणि फिंगर प्रिंट’ यावरच पोलिसांची मदार असायची. घटनास्थळी पोलिसांना काहींना काही तरी पुरावा सापडत होताच, त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही शंभर टक्के होते; मात्र जसजसा काळ बदलला तसतशा गुन्हेगारांच्या पद्धतीही बदलत गेल्या.
सायबर क्राईम आणि कॉल डिटेल्सवर पोलिसांना भर द्यावा लागला. गेल्या दहा-बारा वर्षांत पोलिसांना गंभीर किंवा किरकोळ गुन्ह्यांमध्येही फिंगर प्रिंट मिळत नव्हते. घटना घडून गेल्यानंतर संबंधित व्यक्ती ठसे मिळणार नाहीत, याची काळजी घेत होते. त्यामुळे फिंगर प्रिंटद्वारे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही अत्यल्प होते.
वर्षभरात केवळ एक किंवा दोन गुन्हे उघडकीस यायचे; परंतु सातारा पोलिस दलातील क्राईम ब्रँचच्या टीमने आपले कौशल्य वापरून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. गेल्या दीड वर्षात पाच घरफोड्या आणि एक खून उघडकीस आणून राज्य पोलिस दलात एक मानाचा तुरा खोवला. बोरगाव, कोरेगाव, शाहूपुरी, सातारा तालुका, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यात क्राईम ब्रँचला यश आले.
...अन् बिअरच्या बाटलीवर ठसा
कोरेगाव येथे सहा महिन्यांपूर्वी एका युवकाचा बिअरची बाटली पोटात खुपसून खून करण्यात आला होता. घटनास्थळी बिअरची बाटली होती. या बिअरच्या बाटलीवर संबंधिताची फिंगर प्रिंट मिळाली. त्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली.
फिंगर प्रिंट सापडल्यास शंभर टक्के शिक्षा !
न्यायालयात अनेकदा साक्षीदार पलटल्यामुळे आरोपी सहीसलामत सुटत असतात; मात्र असा एक पुरावा आहे, तो म्हणजे फिंगर प्रिंट. इतर पुरावे डळमळीत झाले तरी हा पुरावा कधीही डळमळीत होत नाही. त्यामुळे या पुराव्याच्या आधारे संशयिताला शंभर टक्के शिक्षा लागतेच.
असा होतो फिंगर प्रिंटचा प्रवास !
कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची जितकी महत्त्वाची भूमिका आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने क्राईम ब्रँचची जबाबदारी मोठी आहे. या टीमने फिंगर प्रिंटचे रिपोर्ट सादर केल्याशिवाय पोलिसांचा तपास पुढे सरकत नाही. घटनास्थळी फिंगर प्रिंट सापडल्यानंतर ठसेतज्ज्ञ मार्किंग करतात. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्यानंतर ती प्रिंट डेव्हलप करून पुणे क्राईम ब्रँचला पाठविली जाते. या ठिकाणी १५ जणांची टीम असते. या टीमच्या प्रत्येकाचे मत जाणून घेऊन फिंगर प्रिंट मॅच केली जाते. त्यानंतरच संबंधित फिंगर प्रिंट नेमकी कोणाची आहे, हे समोर येते. या प्रक्रियेला साधारणता पंधरा दिवसांचा कालावधी लागतो.कोरेगाव येथे सहा महिन्यांपूर्वी एका युवकाचा बिअरची बाटली पोटात खुपसून खून करण्यात आला होता. घटनास्थळी बिअरची बाटली होती. या बिअरच्या बाटलीवर संबंधिताची फिंगर प्रिंट मिळाली. त्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली.
नागरिकांनी काय करू नये !
एखाद्याच्या घरात चोरी झाल्यानंतर त्या कुटुंबाला साहजिकच मानिसक धक्का बसतो. आपल्या घरातील नेमके काय-काय चोरीला गेले आहे. या भीतीपोटी घरातील लोक कपाट उघडून साहित्याची तपासणी करतात. याचवेळी त्यांच्या हाताचे ठसे तेथे उमटतात. त्यामुळे ठसेतज्ज्ञांना चोरट्यांचे ठसे सापडत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पोलिस येईपर्यंत कोणत्याही वस्तूला हात लावू नये. थोडा धीर धरावा, असे आवाहनही पोलिस वारंवार करतात; मात्र याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केल्यामुळे फिंगर प्रिंट सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अत्यल्प होत आहे.