अनेक गावांत तंटामुक्त अभियान ढेपाळले
By Admin | Updated: September 15, 2014 23:26 IST2014-09-15T21:25:53+5:302014-09-15T23:26:39+5:30
अनेक तंटामुक्त समित्या फक्त कागदोपत्री

अनेक गावांत तंटामुक्त अभियान ढेपाळले
सणबूर : शासनाने ग्रामस्वच्छता अभियान निर्मल ग्राम या अभियानाप्रमाणेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले़ मात्र, या अभियानात अनेक अडथळे येत आहेत़ गावाच्या चावडीतच या अभियानाला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे़ गावातील भांडणे गावातच मिटावीत, किरकोळ वादामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा वाया जाऊ नये आणि गावात शांतता प्रस्थापित होऊन सलोखा वाढावा, यासाठी शासनाने तंटामुक्त गाव अभियान सुरू केले़ मात्र हे अभियान राबविण्यात राजकीय गटतट प्रामुख्याने अडथळा ठरत आहेत़ गटातटाच्या वादामुळेच ग्रामस्थांतील अनेक तंटे पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. तसेच काही वाद न्यायालयातही गेले आहेत़ ग्रामपंचायतींमधील सत्ताधारी गट दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांना तंटामुक्त समितीत स्थान देत नाहीत़ तेथूनच खरी तंट्याला सुरुवात होते. तंटामुक्तीसाठी आयोजित केलेल्या सभेतही वाद झाले आहेत़ सध्या अनेक तंटामुक्त समित्या फक्त कागदोपत्री उरल्या आहेत. त्यांच्याकडून कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही. राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढल्याने समितीतील पदाधिकारी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)