म्हसवड : विवाह सोहळा आटोपून घरी परतत असताना दिवड (ता. माण) जवळ जीप उलटून झालेल्या अपघातात लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व गावचे सरपंच दिनकर व्यंकटराव पाटील (बोरगाव, ता. औसा) यांचा मृत्यू झाला. यामध्ये आठजण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव येथील विवाह सोहळा संपवून मांजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर पाटील (वय ५२) हे जीप (एमएच २३ व्ही २९१६) मधून लातूरकडे निघाले होते. त्यांची गाडी काल, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास माण तालुक्यातील दिवडजवळ आली असता समोरून येत असलेल्या वाहनाला रस्ता सोडत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे गाडीने पलटी खाल्या. अपघातात चालकाशेजारी बसलेले दिनकर पाटील यांचा मृत्यू झाला. तसेच नवनाथ भाऊसाहेब साळुंखे, विठ्ठल महादेव पाटील, चंद्रसेन शंकरराव पाटील, दगडू रामदास शिंदे, बाळासाहेब आबासाहेब सुतार, गुणवंत राजाराम बागल, अशोक उत्तमराव कट्यारे, बाबूराव महादेव डांगिरे (सर्व रा. बोरगाव, ता. औसा, जि. लातूर) हे जखमी झाले. म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करून जखमींना सोडून दिले. अपघाताची नोंद म्हसवड पोलिसात झाली आहे. (प्रतिनिधी)
‘मांजरा’च्या संचालकाचा दिवडजवळ अपघाती मृत्यू
By admin | Updated: June 10, 2014 02:14 IST