मनोमिलनाची सत्त्वपरीक्षा अन् तिसऱ्या आघाडीची टक्कर!

By Admin | Updated: June 1, 2016 01:00 IST2016-05-31T23:29:08+5:302016-06-01T01:00:48+5:30

सातारा - नगरपालिकांचे रणांगण

Manashakti Sattva exam and third front collision! | मनोमिलनाची सत्त्वपरीक्षा अन् तिसऱ्या आघाडीची टक्कर!

मनोमिलनाची सत्त्वपरीक्षा अन् तिसऱ्या आघाडीची टक्कर!


सागर गुजर -- सातारा
ऐतिहासिक सातारा शहराच्या राजकारणात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठी उलथा-पालथ होण्याची शक्यता सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. पालिका निवडणुकीची रंगीत तालीम सध्या शहरातील जनता बँक निवडणुकीच्या निमित्ताने दिसत असून, मनोमिलनाला धक्का देण्यासाठी तिसरी आघाडी जुळविण्याच्या हालचाली यानिमित्ताने पुढे येऊ लागल्या आहेत. नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून करायची असल्याने दोन्ही राजेंपुढे निष्ठावान इच्छुकांपैकी कोणाला निवडायचे हा पेच आहे. तर भाजप-शिवसेनेनेही मनोमिलनातील नाराजांसोबत सूत जुळवून टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.
केंद्र व राज्यात सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या शहरातील शिलेदारांना लढण्याचे बळ मिळाले असल्याने भाजपचेही पॅनेल उभे राहणार, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
शहराचे नगराध्यक्षपदावर सध्या तरी खुल्या गटाचे आरक्षण आहे. निवडणुकीपूर्वी हे आरक्षण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या आरक्षणामुळे अनेकांच्या आकांक्षांना पंख फुटले आहेत. मनोमिलनाला मानणाऱ्यांपैकी अनेकजण या पदासाठी इच्छुक आहेत. ‘मिनी आमदार’ ठरणाऱ्या या पदावर आपल्याच विचाराचा माणूस बसावा, यासाठी दोन्ही राजे आग्रही आहेत.
निवडणूक मनोमिलनाच्या माध्यमातून करायचा निर्णय झाल्यास उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना एका उमेदवारावर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. आता याबाबतीत दोघा राजेंत एकमत होईल का?, हाही प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडण्याच्या स्पर्धेत राहणार असल्याने नाराजांना मनोमिलना व्यतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्याची भूमिका भाजपची मंडळी करू शकतात. असे झाले तर मनोमिलन मानणाऱ्यांना ही डोकेदुखी ठरणार आहे.
अवघी १ लाख २० हजार १९५ इतक्या लोकसंख्येचं हे सातारा शहर आहे. सध्याच्या घडीला १० प्रभागांमध्ये ३९ लोकनियुक्त नगरसेवक कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीनंतर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाच्या महिला उमेदवाराच्या माध्यमातून १ वाढीव नगरसेवक पालिकेत निवडून जाणार असून, लोकनियुक्त नगरसेवकांची एकूण संख्या ४० इतकी होईल.
हद्दवाढीमध्ये करंजे व गोडोलीचा सध्या नगरपालिका क्षेत्रातील असणाऱ्या भागाव्यतिरिक्त उर्वरित परिसर, दरे खुर्द (यवतेश्वर पायथा), शाहूपुरी, अजिंक्यतारा किल्ला, राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील खेड, कोडोली या गावांचा परिसर या हद्दवाढीच्या प्रस्तावात घेण्यात आला आहे.
हद्दवाढीनंतर लोकसंख्या - १ लाख ९८ हजार इतकी लोकसंख्या होईल. शहराचे होणारे एकूण क्षेत्रफळ १८ चौरस किलो मीटर इतके वाढेल. सातारा शहराजवळ दोन मोठ्या आद्योगिक वसाहती आहेत; परंतु त्या शहराबाहेर असल्याने त्यांचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही. हद्दवाढीमध्ये औद्योगिक वसाहतही कशा पद्धतीने घेता येईल, याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
सातारा पालिकेचे उत्पन्न कमी असल्याने पालिकेला विकासकामांच्या बाबतीत मर्यादा पडत असल्या तरी राजकीय व प्रशासकीय पातळीवर असणाऱ्या सुरेल समन्वयामुळे राज्य व केंद्र शासनाचे अनुदान मिळविण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. आता केंद्र शासनानेही राज्य शासनाला अनुदानाच्या रकमा पालिकांना वेळेत अदा करण्याच्या सूचना करुन हा निधी अडकवून ठेवल्यास व्याज आकारु, अशी तंबी दिल्याने पालिकेच्या निधीचा मार्ग मोकळा झालाय.

Web Title: Manashakti Sattva exam and third front collision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.