जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज!
By Admin | Updated: July 16, 2014 22:54 IST2014-07-16T22:51:34+5:302014-07-16T22:54:38+5:30
वाई, जावळी, फलटण, महाबळेश्वर, पाटण अन् खंडाळा राष्ट्रवादीकडे जाणार

जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज!
सातारा : जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापतींच्या अखेरच्या अडीच वर्षांसाठी आरक्षण सोडतीत सात ठिकाणी महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर माण आणि कोरेगावला काँग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ समसमान असल्याने तेथे चिठ्ठीद्वारे, तर वाई, खंडाळा, पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि फलटण पंचायत समित्यांची सत्ता एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील, असे चित्र आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज, बुधवारी दुपारी एकला सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., ‘महसूल’चे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. आज जाहीर केलेले आरक्षण हे दि. १४ सप्टेंबरपासून शेवटच्या अडीच वर्षांसाठी असणार आहे. वाई पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते; पण या ठिकाणी सदस्य नाही. त्यामुळे वाईतील आरक्षण ‘ओबीसी’कडे गेले. साताऱ्यात शेवटची अडीच वर्षे सत्ता खासदार उदयनराजे भोसले गटाकडे राहणार आहे. ‘सर्वसाधारण महिला’ यासाठी नागठाणे गणातील विश्रांती साळुंखे यांची सभापतिपदी वर्णी निश्चित मानली जात आहे.
खटाव पंचायत समिती सभापती निवडीच्यावेळी राष्ट्रवादीचे बलाबल असेल; परंतु अनिश्चितता असणार आहे. या निवडीत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व सुरेंद्र गुदगे यांच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असणार आहे. पाटण पंचायत समितीत शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाचे समान सदस्य आहेत. मात्र, आताच्या आरक्षणानुसार देसाई गटाकडे ओबीसी महिला सदस्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती बिनविरोध होईल, असे संकेत आहेत. (प्रतिनिधी)