मराठा आरक्षणासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद
By Admin | Updated: April 24, 2016 23:25 IST2016-04-24T22:43:53+5:302016-04-24T23:25:31+5:30
नीलेश राणे : राज्यव्यापी दौऱ्याचा रत्नागिरीत आरंभ

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद
रत्नागिरी : गुजरातमधील १५ टक्के पटेल समाजाने आपल्या मागण्यांसाठी गुजरात पेटविले. महाराष्ट्रात ३२ टक्के मराठा समाज आहे. मग मराठा समाजासाठी शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळविण्यात तुम्ही मागे का? पेटून उठा. आपण एकजुटीने हा लढा लढायला हवा. फडणवीस सरकारने कायद्याच्या आडून दाबून ठेवलेला मराठा आरक्षणाचा आपला हक्क मिळालाच पाहिजे. आता लढाई आर या पार असेल. होईल ते होऊदे. आरक्षण मिळविण्यासाठी प्रसंगी मुंबई, महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजीखासदार नीलेश राणे यांनी रविवारी दिला. तसेच येत्या ११ जुलैला मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी सज्ज होण्याचे आवाहनही केले.
येथील मराठा मैदानात मराठा समाज बांधवांचा मेळावा रविवारी सायंकाळी आयोजित केला होता. या सभेला जिल्ह्यातील मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर केशवराव भोसले, विजय भोसले, माजी आमदार विजय तथा आप्पा साळवी, राजन देसाई, मधुकर दळवी, केशवराव इंदुलकर, सुधाकर सावंत, जिजाऊ संघटनेचे कोकण संघटक सुधीर भोसले व अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले, जे मराठा आरक्षण मागणीच्या आड येतील, त्यांना समाज सोडणार नाही. या आरक्षणासाठीचा राज्यव्यापी दौरा रत्नागिरीतून सुरू केला आहे. ज्यांना बरोबर यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे. आम्ही नोकरी व शिक्षणात आरक्षण मागत आहोत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी १६ टक्के आरक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारला सादर केला आहे. मात्र, आताच्या फडणवीस सरकारने तो दाबून ठेवण्याचा डाव रचला आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी राज्यातील मराठा समाजाने एकत्र यावे. आपला यात कोणताही पक्षीय हेतू नाही, असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरात फिरताना मराठा समाजात मोठ्या प्रमाणात गरिबी दिसली. त्यातूनच राणे यांनी राज्यातील ३२ टक्के मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाबाबतचा अहवाल शासनाला सादर केला. मात्र, कायद्याच्या जंजाळात हा अहवाल अडकून पडला असून, मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. ते मिळविण्यासाठीच ही मोठी लढाई राज्यभरातील समाज बांधवांना एकत्रित येऊन लढावयाची आहे. राज्याच्या प्रत्येक भागात मराठा समाजाच्या सभा आपण घेणार आहे. या लढ्यात मुख्यमंत्री विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला हलके समजू नये. मराठा समाज मैदान सोडणार नाही. आजवर एकजूट नव्हती म्हणून यांना माज आलाय. त्यामुळे या राज्यव्यापी दौऱ्यानंतर ११ जुलैला पाच लाखांचा मोर्चा मुंबईत धडकेल, असेही ते म्हणाले. यावेळी समाजाचे नेते केशवराव भोसले म्हणाले, राजकारणात खोटारडेपणा वाढला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई नीलेश राणे हे एकट्याने लढू शकत नाहीत. त्यांना सर्व मराठा बांधवांनी ताकद द्यावी, साथ द्यावी व मराठा समाजातील गोरगरिबांसाठी ही लढाई लढून जिंकावी. मराठा आरक्षण होण्याची शक्यता धूसर होती, परंतु माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे ती दृष्टिक्षेपात आली आहे, असे सुधीर भोसले म्हणाले. शिक्षण व नोकरीत आरक्षण नसल्याने मराठा समाजाची पीछेहाट झाल्याचे मधुकर दळवी म्हणाले. देणग्या घेत शिक्षणाचा बाजार करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आप्पा साळवी म्हणाले. राजन देसाई व सुधाकर सावंत यांनीही आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)
दुसऱ्याचे न ऐकणारा मुख्यमंत्री
दर दिवशी मराठा समाज बांधवांची तडफड सुरू आहे. ही तडफड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दिसत नाही. हे मुख्यमंत्री तिरसट आहेत. दुसऱ्याचे न ऐकणारा मुख्यमंत्री आम्ही याआधी पाहिलेला नाही. मराठा आरक्षणासाठी यांना कशासाठी पाया पडायचे. स्वाभिमानी मराठा समाजाचा तो बाणा नाही. मराठा समाज पाया पडत नाही तर हक्क मिळविण्यासाठी पाय तोडतो, हे लक्षात ठेवावे. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. त्यामुळे आता हा राज्यव्यापी लढा कोणीही थांबवू शकणार नाही. आरक्षण हे मिळविणारच, असे नीलेश राणे यांनी यावेळी निक्षून सांगितले.