टीकाकारांना ‘कमळ’ अन् निष्ठावंताना ‘काटे’!
By Admin | Updated: August 13, 2014 23:38 IST2014-08-13T23:19:54+5:302014-08-13T23:38:22+5:30
भाजपचे धोरण : निवडून येण्याची शक्यता असलेल्या मातब्बरांनाच म्हणे तिकीट; जुने पदाधिकारी मात्र अस्वस्थ

टीकाकारांना ‘कमळ’ अन् निष्ठावंताना ‘काटे’!
सातारा : ज्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये राहून भारतीय जनता पक्षावर टीकेचा आसूड ओढला त्याच मंडळींसाठी भाजपच्या नेत्यांनी पायघड्या अंथरल्या आहेत. नव्याने पक्षात येणाऱ्यांना प्रमाणापेक्षा अधिकचे दिलेले महत्त्व भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना खटकत असल्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढू लागली आहे. सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव या तीन तालुक्यांत त्याची तीव्रता अधिक आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही भाजपमध्ये देण्यात आलेल्या प्रवेशामुळे आश्चर्याचा सूर उमटत आहे.
भाजपची नेतेमंडळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती ‘कमळ’ देण्यास सरसावली असली तरी ज्यांनी आयुष्यभर भाजपचा प्रचार आणि प्रसार केला त्यांना मात्र बाजूलाच ठेवले जात आहे. परिणामी निष्ठावंतांचा हा गट अस्वस्थ झाला आहे. दिलीप येळगावकरांना विरोध असतानाही त्यांना प्रवेश दिल्याची चर्चाही तावडे यांच्या पत्रकार परिषदेत झाली. परिणामी त्यांनीही यावर कोणतेही भाष्य केले नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य काही नेते जिल्ह्यातील भाजपच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता थेट प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधून भाजपमध्ये घेण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊ लागले आहेत.
भाजपला कोणत्याही परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि खास करून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा झटका द्यायचा आहे. त्यासाठीची जबाबदारी ही विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. परिणामी गेले काही दिवस ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले आहे.
युतीच्या जागा वाटपाप्रमाणे भाजपकडे कऱ्हाड दक्षिण, माण आणि सातारा हे तीन मतदारसंघ होते. आता तर त्यांनी जिल्ह्यात या तीन मतदारसंघांबरोबरच कोरेगाव आणि फलटण या आणखी दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेसाठी धक्कादायक आहे. त्याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नसली तरी आज ना उद्या त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
कोरेगाव आणि माण विधानसभा मतदारसंघांत भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कोरेगाव शिवसेनेकडे असताना येथून भाजपकडून माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी विनोद तावडे यांच्या उपस्थितीतच सातारा येथे उमेदवारीस नकार दिला असला तरी कार्यकर्ते त्यांच्यासाठी आग्रही आहेत. आता तर महेश शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठीच शड्डू ठोकला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सध्या तरी हा मतदारसंघ शिवसेना भाजपला सोडेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भाजपचा जुना गट अस्वस्थ आहे.
कोरेगावातील काँग्रेसचा एक नेता आपल्या एका नातेवाइकाच्या मदतीने भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यांना कोरेगावातून उमेदवारी हवी, अशी त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
कोरेगावात शिवसेनेचे काय..?
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडावा या मागणीमुळे शिवसेनेचाही एक गट अस्वस्थ झाला आहे. हणमंत चवरे, दिनेश बर्गे, दत्ताजी बर्गे, हरिदास जगदाळे, चंद्रकांत जाधव, प्रताप जाधव ही जुनी आणि निष्ठावंत मंडळी गेले अनेक दिवस दोन्ही काँग्रेसच्या विरोधात लढत असून, यापैकी अनेकांना आमदारकी लढवायची आहे. हणमंत चवरे, दिनेश बर्गे आणि दत्ताजी बर्गे यांनी तर शड्डूच ठोकला आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादीचे महेश शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनाच उमेदवार म्हणून पुढे केले जात आहे. ही बाब स्थानिक शिवसेना नेत्यांसाठी चुळबूळ वाढविणारी ठरली असल्याची चर्चा आहे.