आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थाने उजळतोय!
By Admin | Updated: August 19, 2015 21:21 IST2015-08-19T21:21:07+5:302015-08-19T21:21:07+5:30
कऱ्हाडचे महिला मंडळ : भजन सेवेची रौप्यमहोत्सवी वाटचाल

आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थाने उजळतोय!
प्रमोद सुकरे - कऱ्हाड महाराष्ट्रातील सुमारे ८५० वर्षांपूर्वीपासून संत विचारांची परंपरा आजच्या जमान्यातही टिकून आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदींनी घालून दिलेल्या परमार्थाच्या वाटेवरूनच अनेकांचे मार्गक्रमण चालू असल्याचे आजही दिसते. कऱ्हाडच्या वीरशैव महिला भजनी मंडळाने तर गेल्या २५ वर्षांपासून अभंग, ओव्या, गवळणी म्हणत रौप्यमहोत्सवी वाटचाल केली आहे. या मंडळातील बहुतांशी सदस्यांनी साठी तर गाठली आहेच; पण काहीनी वयाची पंचाहत्तरीही पूर्ण केली आहे.भजन सेवेतून आपले जगणे सुसह्य करणाऱ्या, भजन सेवेत दंग राहणाऱ्या या सदस्यांना ‘राम राम म्हणता म्हणता, जावो प्राण’ असेच वाटत असावे. जणू त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थानेच उजळतोय, असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या धमण्यांतून संतांचे विचार वाहतात, असं म्हंटलं तरी चुकीचे ठरणार नाही. जन्माचे ते मूळ । पाहिले शोधून । दु:खाशी कारण । जन्म घ्यावा ।।म्हणजे, दु:ख भेगण्यासाठीच माणसाने जन्म घ्यावा, असे संत सांगतात तर,
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधुनी पाहे ।, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. त्यामुळे या सर्व दु:खावर ‘विठ्ठलाचे नामस्मरण’ हा एकमेव रामबाण उपाय आहे, हे कळल्यामुळेच कऱ्हाडातील पंधरा-वीस महिला १९९१ मध्ये एकत्र आल्या. भजनी मंडळ स्थापन करायचं ठरवलं. गणेश पारगावकर यांच्याकडून भजनाचे धडे घेतले; अन् आजवर हजारो भजनांचे कार्यक्रम त्यांनी केले. खरंतर प्रत्येकाच्या जीवनात, प्रपंच्यात अनेक व्यथा, अडचणी, अपार कष्ट, हे सारं असतंच; पण त्या साऱ्यावर पुष्पा दळवी, सुनंदा देशमाने, रेखा घाटे, सुरेखा डुबल, कालिंदी डुबल, शालन विभुते, राजश्री चिंगळे, सुमन जंगम, कमल बेडके, लता बेंद्रे, छाया मुंढेकर, लीला फल्ले, उषा उमरदंड, मुक्ता घाटे, कल्पना दळवी, सुनीता गुजर, शालिनी वांगकर, जयश्री तोडकर यांनी महिला भजनी मंडळाची वाटचाल सुरू केली. एखाद्या गोष्टीत स्वत:ला झोकून देणं अन् त्यात सलग २५ वर्षे सातत्य ठेवणं खूप कठीण काम; पण ते काम या महिलांनी केलं आहे.
सामाजिक बांधिलकीचीही जाणीव
भजन अन् रूद्र पठणात नेहमी मग्न राहणाऱ्या या महिलांच्या मनात सामाजिक बांधिलकीची जाणही तितकीच आहे. म्हणून तर दुष्काळग्रस्त भागातील चारा छावणीसाठी आर्थिक मदत, कारगिल युद्धातील शहीद झालेल्या सैनिकांच्या कल्याणनिधीसही मदतीचा हात त्यांनी त्या-त्यावेळी दिला आहे. खरंतर आज सासूने सुनेचं अन् सुनेनं सासूचं कौतुक केल्याचं दृश्य दुर्मिळ झालंय; पण भजनसेवेची रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या या सर्व सासवांचा त्यांच्या सुनांनी नुकताच एक कार्यक्रम घेऊन सत्कार केला. तेव्हा आता ‘तुम्ही चालवा हा पुढे वारसा’ अशी साद सासूबार्इंनी आपल्या सूनबार्इंना घातली. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, प्रा. शीला कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
त्या जपताहेत
रूद्र पठणाचीही परंपरा...
भजनाबरोबर या मंडळाच्या सदस्या रूद्र पठणही करतात. सुमारे तीन तास चालणाऱ्या रूद्र पठणाचे कऱ्हाडसह मुंबई, पुणे, केल्हापूर आदी जिल्ह्यांत केले आहेत. आजवर त्यांनी सुमोर पाचशे कार्यक्रम केले असल्याचे पुष्पा दळवी सांगतात. त्यांच्या या उपक्रमांचेही समाजातून कौतुक होत आहे.