अजितदादांची पाठ; पण कार्यकर्त्यांची साथ!
By Admin | Updated: July 27, 2014 23:02 IST2014-07-27T22:42:51+5:302014-07-27T23:02:14+5:30
कऱ्हाड दौरा : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसाठी कॉँग्रेसकडून ‘साखरपेरणी’

अजितदादांची पाठ; पण कार्यकर्त्यांची साथ!
कऱ्हाड : गेल्या सहा महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ मिळत नसल्याने येथील यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण लांबले होते. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रम ठरला देखील; पण प्रत्यक्ष दादांनी कऱ्हाड दौऱ्याकडे पाठ फिरविल्याने ते या कार्यक्रमापासून लांबच राहिले. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोहळ्याला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसाठी कॉँग्रेसकडूनही व्यवस्थित ‘साखर पेरणी’ झाली.येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी सर्वसाधारण सभेत झाला. त्यानंतर तो उभारण्यात येऊन सुमारे सहा ते सात महिने झाले. त्याचे अनावरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे, अशी संचालक मंडळाची अपेक्षा होती.
मुख्यमंत्री कऱ्हाडचे सुपुत्र असल्याने त्यांची तारीख मिळणे फारसे अवघड नव्हते; पण उपमुख्यमंत्र्यांची तारीख मात्र लवकर मिळत नव्हती म्हणे! त्यामुळे एक-दोनदा मुख्यमंत्र्यांची वेळ मिळूनही अजितदादांसाठी ती तारीख लांबविण्यात आली. सरतेशेवटी रविवार, दि. २७ ला त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले; पण अजितदादांनी दौराच रद्द केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी जाणवली.बाजार समितीत राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीची सत्ता आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी नेते या महाआघाडीत आहेत. त्यामुळे पुतळा अनावरणाला बाबा-दादा एकत्र येण्यारच, अशी अटकळ बांधली जात होती. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच दिवशी एकाच विमानतळावर उतरले खरे; पण त्यांचे कार्यक्रम स्वतंत्र झाले. त्याची उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राज्यात दोन्ही पक्षांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटणीवरून ताणाताणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बाबा-दादा कऱ्हाडात आल्यावर काय-काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी होती.
राजकीयदृष्ट्या कार्यक्रमाचे महत्त्व ओळखून राज्यातली मीडिया कऱ्हाडात पोहोचली होती. मात्र, अजितदादांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. (प्रतिनिधी)
बाळासाहेबांना पुढे घ्या..!
यशवंतरावांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील गर्दीत थोडे पाठीमागे होते. मात्र, आमदार आनंदराव पाटील यांनी बाळासाहेबांना पुढे घ्या, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुचविले आणि बाबांनी बाळासाहेब पाटील यांना जवळ घेतले. माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत हिंगमिरे यांच्याबरोबर फोटो घेतानाही आमदार बाळासाहेब पाटील यांना बाबांनी आवर्जुन बरोबर घेतले. त्यामुळे बाबांनी दक्षिणवर स्वारी केली तर बाळासाहेब त्यांच्याबरोबर राहतील, अशी आशा सर्वजण बाळगून आहेत.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिल्याने आजच्या कार्यक्रमाला राजकीय महत्त्व होतेच. अजित पवार हजर राहिले असते तर आणखी संदर्भ त्याला मिळाले असतेच. मात्र, अजित पवार अनुपस्थित होतेच; पण मुख्यमंत्री चव्हाण यांनीही दक्षिण स्वारीच्या अनुषंगाने ‘ब्र’ शब्दही न काढता कृषी धोरणावरच बोलणे पसंत केले.