साताऱ्याची भूमी चळवळींची : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:37+5:302021-01-08T06:06:37+5:30
सातारा : सातारा ही चळवळींची भूमी असून, समाजहिताची तळमळ असलेले कार्यकर्ते या भूमीत घडले. १७० वर्षांपूर्वी मुलींसाठी शिक्षणाची दारे ...

साताऱ्याची भूमी चळवळींची : पाटील
सातारा : सातारा ही चळवळींची भूमी असून, समाजहिताची तळमळ असलेले कार्यकर्ते या भूमीत घडले. १७० वर्षांपूर्वी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे माहेरघर असल्यामुळे स्त्री मुक्तीची आणि सक्षमीकरणाची चळवळही साताऱ्यात रूजली, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते नंदकुमार पाटील यांनी काढले.
येथील लेक लाडकी अभियानच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले संघर्ष पुरस्कारांचे वितरण अभिनेते पाटील आणि डॉ. विजया चिंडक यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सावित्री उत्सवात ‘पंख फुटलेली मुलगी’ हा सत्यघटनेवर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. कैलास जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सोनाली बडे या मुलीचा बालविवाह झाल्यानंतरचा संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिनेच स्वत:ची भूमिका साकारली असून, दीपेन्ती चिकणे, शशी गाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वैद्यकीय पेशा सेवाव्रत म्हणून स्वीकारलेल्या आणि जनजागृतीच्या सातत्यपूर्ण कार्यासह कोरोनाकाळात अविरत सेवा बजावणाऱ्या पनवेलच्या डॉ. मेघा देशपांडे आणि स्त्री मुक्तीच्या आंदोलनात प्रसंगी धोके आणि तुरुंगवास पत्करून प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या सातारच्या अॅड. शैलजा जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर सामान्यातील असामान्य म्हणून एकूण चार व्यक्तींचा आणि दोन संस्थांचा गौरव करण्यात आला. त्यात अंगणवाडीला आयओएस प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सावली येथील अनुजा साळुंखे, कोरोनाकाळात अखंड कार्यरत असलेले सातारा कोविड डिफेन्डर्स ग्रुपचे विनीत पाटील, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करणारे सचिन सोनावणे, गोधडी शिवण्याचा व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजक बनलेल्या जवळवाडी येथील सुनंदा जवळ यांचा समावेश होता. कोरोनाकाळात संकटग्रस्तांना भोजन आणि अन्नधान्य पुरविणारा रॉकस्टार आझाद ग्रुप आणि मुस्लिम जागृती अभियान या संस्थांच्या कार्यकर्त्यांनाही गौरविण्यात आले.
अॅड. वर्षा देशपांडे यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा परिचय करून दिला. अॅड. चैत्रा व्ही. एस. यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविक वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोहित जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राजक्ता महामुनी यांनी गीते सादर केली. कार्यक्रमास मिनाज सय्यद, दिलीप भोजने, जनार्दन घाडगे, उमेश खंडजोडे, डॉ. स्मिता कासार, प्रा. संजीव बोंडे, सुबोध कुलकर्णी, अॅड. राजीव अत्रे, जनार्दन पवार, राजीव मुळ्ये आदी उपस्थित होते. अॅड. वनराज पवार यांनी आभार मानले.