कोयना धरण अर्धे भरले
By Admin | Updated: July 27, 2014 23:06 IST2014-07-27T22:25:58+5:302014-07-27T23:06:19+5:30
पावसाचा जोर वाढला : तारळी धरणातून विसर्ग सुरू

कोयना धरण अर्धे भरले
सातारा / कोयनानगर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी पावसाचा जोर मंदावला होता; मात्र दुपारनंतर जोर वाढल्यामुळे धरणांत पाणीसाठाही वाढत आहे. धरणात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१.६४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, तारळी नदीवर असलेल्या तारळी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून २३५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात आणि खास करून पश्चिम भागात गेल्या दहा दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मात्र, पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कण्हेर आणि उरमोडी पाणलोट क्षेत्रातही संततधार कायम असल्यामुळे या धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कण्हेर धरणात सात टीएमसी तर उरमोडी धरणात ८.०७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, रविवारी सांयकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ५१.६४ टीएमसी इतका झाला होता. कोयना धरणातील येवा २५,१९२ क्युसेक इतका असून पाणीपातळी २१०९.१ फूट इतकी आहे. कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासांत ५४, नवजा येथे ६४ तर महाबळेश्वर येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी दिवसभर उन पावसाचा खेळ सुरू होता. हवेत गारवा असल्यामुळे रविवारी सातारकर बाहेर पडले नव्हते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, तालुकानिहाय सरासरी ८.९ मिमी इतकी आहे.जिल्ह्यात आजअखेर झालेला पाऊस ५१९८.५ मिमी इतका असून, तालुकानिहाय सरासरी ४९४.५ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)