कोंडवे गावाला लागली विकासाची आस! उदयनराजेंकडून दत्तक
By Admin | Updated: November 11, 2014 00:01 IST2014-11-10T21:34:37+5:302014-11-11T00:01:11+5:30
देशात ‘पथदर्शी’ बनण्यासाठी ग्रामस्थही एकवटले

कोंडवे गावाला लागली विकासाची आस! उदयनराजेंकडून दत्तक
जगदीश कोष्टी -सातारा --पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेण्यास प्रारंभ झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी कोंडवे हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे गावाला विकासाची आस लागली असून, खासदारांच्या संकल्पनेतून गाव देशात आदर्श बनविण्यासाठी ग्रामस्थांनी साथ देण्यासाठी एकजूट दाखविली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी कोंडवे गाव दत्तक घेतल्याचे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांच्या नजरा या गावाकडे लागल्या आहेत. उदयनराजे भोसले वाई तालुक्यातील बावधन हे गाव दत्तक घेणार होते. मात्र, उदयनराजेंनी आपले गाव दत्तक घेतल्यास विकास झपाट्याने होईल, या आशेने कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. अन् त्याला जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, बबनराव चोरगे, बबनराव ननावरे यांची साथ लाभली. त्यामुळे उदयनराजेही त्यांचा आग्रह मोडू शकले नाहीत. सातारा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या कोंडवेला ग्रामपंचायत असली तरी ग्रामस्थांचा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सातारा शहराशी संबंध येत असतो. गावात दहावीपर्यंत शिक्षणाची सोय असली तरी असंख्य मुलं शिक्षणासाठी सातारा शहरात येतात. त्यामुळे या लोकांची नाळ शहराशीच अधिक घट्ट बांधली गेली आहे. ४,७७७ लोकसंख्येच्या कोंडवेत तेरा ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, दोन्ही वाड्यांना धरून असल्याने या गावात ‘मनोमिलन पॅटर्न’ चांगलाच रुजला आहे. गावात चोरगे, निंबाळकर, गाडे ही घराणी आहेत. गावात विविध कार्यकारी सोसायटी असून, ती खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या ताब्यात आहे. दृष्टिक्षेपात गाव लोकसंख्या : ४,७७७ स्त्रिया : २,३४७ पुरुष : २,५३० मतदार : ३,८४२ प्रभाग : ५ उत्पन्नाचे साधन : विविध प्रकारे कर व शासकीय योजना प्रमुख पिके : ऊस, ज्वारी, गहू जमीन खरेदी-विकी : प्रमाण कमी ग्रामदैवत : ज्योतिर्लिंग मंदिरे : ७ मशीद : १ गुन्हेगारीचे प्रमाण : कमी विविध योजनांत सहभाग सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणारे कोंडवे हे १९९३ मध्ये पहिले गाव ठरले होते. या स्वच्छतागृहावर बायोगॅस प्रणाली बसवून गॅस पुरवठा केला जात होता. तसेच या गावाने ‘पर्यावरणपूरक समृद्ध ग्राम’ योजनेत सहल तीन वर्षे यश मिळविले असून, २०१२-१३ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत प्रथम क्रमांक मिळविला होता. देशभक्तीचा वारसा सातारा जिल्हा शूरवीरांचा, पराक्रमींचा म्हणून ओळखला जातो. हाच वारसा कोंडवे गावानेही वारसा जपला आहे. दिनकरराव चोरगे, केशवराव चोरगे, मारुती निंबाळकर हे तीन स्वातंत्रसैनिक तसेच रामचंद्र निंबाळकर, यादवराव चोरगे हे कॅप्टन घडले आहेत. तसेच शिक्षणाधिकारी हणमंत भुजबळ, जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष दिनकरराव बोडके हे याच गावातील असून, वर्षा गायकवाड, हणमंत गायकवाड यांचे मूळगाव कोंडवेच आहे. गावच्या यात्रेला ते येत असतात. राळेगणसिद्धी, हिवरे बुद्रुकला भेट खासदार उदयनराजे भोसले यांनी गाव दत्तक घेतल्याचे समजताच गावात विविध योजना कशा प्रकारे आणता येतील याचा अभ्यास करण्यासाठी गावातील पंचवीस जणांचे पथक समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी तसेच हिवरे बुद्रुक या गावाला भेट देऊन आले आहे.