मुख्याधिकारी म्हणजे चहापेक्षा किटली गरम!
By Admin | Updated: May 27, 2016 22:18 IST2016-05-27T22:18:01+5:302016-05-27T22:18:29+5:30
उपनगराध्यक्षांची बोचरी टीका : म्हणे... ‘इमेज बिल्ड’ करण्यासाठी प्रशासन प्रमुख हुकूमशहाप्रमाणे वागतात--कऱ्हाड पालिका

मुख्याधिकारी म्हणजे चहापेक्षा किटली गरम!
कऱ्हाड : गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या प्रशासन प्रमुखांकडून आपली ‘इमेज बिल्ड’ करण्यासाठी हुुकूमशहाप्रमाणे वर्तन केले जात आहे. नियमांवर बोट ठवून स्वत:चे महत्त्व वाढविले जात आहे. हे म्हणजे चहापेक्षा किटली गरम, असाच प्रकार सुरू असल्याची बोचरी टीका उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नाव न घेता केली.
कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता देसाई होत्या. यावेळी नगरअभियंता एन. एस. पवार उपस्थित होते.
सुभाष पाटील म्हणाले, ‘पालिकेकडून शहरातील नागरिकांना फलक लावण्यासाठी परवानगीच दिली जात नाही. यासाठी उच्च न्यायालयाच्या निकालावर बोट ठेवले जाते. परवानगी दिली जात नसल्यामुळेच नागरिकांकडून विनापरवानगी फलक लावण्यात येत आहेत. यासाठी पालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे. विरोधी नगरसेवक विनायक पावसकर यांनी सार्वजनिक मंडळांकडून पालिका मंडप उभारणीसाठी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचे सांगत याबाबत नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली. मंडळांनी कार्यक्रम आयोजित करायचे की नगरपालिकेचे भाडे भरण्यासाठी पैसे गोळा करीत फिरायचे. नगरपालिकेने उत्पन्नवाढीसाठी इतर मार्ग अवलंबावेत, अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.’
सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक मानसिंग पाटील यांनी याबाबत आपण रीतसर ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू म्हणजे ही अन्यायी भाडेवाढ रद्द करता येईल, असे सांगितले. मार्केट यार्ड परिसरातील पी. डी. पाटील उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना स्मिता हुलवान यांनी यासाठी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले. अनेक विकासकामांबाबत नगरअभियंता एन. एस. पवार कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत. तसेच सत्ताधारी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नसल्याची टीकाही त्यांनी केली. यावर उपनगराध्यक्ष पाटील तसेच राजेंद्र यादव यांनी यासाठी आमच्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारा, असा सल्ला दिला. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन कामाच्या दजार्बाबत विनायक पावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून या सभागृहाचे काम सुरू असून, ते अजिबात समाधानकारक झालेले नाही. तब्बल ६ कोटी खर्च करूनही हे काम अपूर्णच आहे. एसी बंद आहे, तर पंखे बसवण्यातच आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक कार्यक्रम सुरू असताना एसी नादुरुस्त झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता तर पहिलाच हॉल बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुपारच्या वेळीच जर टाऊन हॉल बंद ठेवण्यात येत असेल तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय?’ श्रीकांत मुळे यांनी शिवाजी स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानात अनेक त्रुटी असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे
विनायक पावसकर यांनी सत्ताधारी आघाडीच्या कामकाजाचे वाभाडे काढताना नगराध्यक्षांनाही लक्ष्य बनविले. ते म्हणाले, ‘प्रत्यक्ष नगराध्यक्षांच्या प्रभागातही अनेक कामे प्रलंबित राहिले आहेत. नगराध्यक्षांना काही अधिकार आहे की नाही? त्या आपल्या अधिकारांचा वापर कधी करणार? स्मिता हुलवान यांनीही नगराध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराची जबाबदारी स्वीकारावी,’ अशी टीका केली.