पतंग काटली; कपबशी खणखणली!
By Admin | Updated: August 25, 2015 23:04 IST2015-08-25T23:04:13+5:302015-08-25T23:04:13+5:30
पाटण बाजार समिती निवडणूक : ‘पाटणकर’गटाला शह देण्याचे ‘देसार्इं’चे सर्व प्रयत्न अयशस्वी

पतंग काटली; कपबशी खणखणली!
अरूण पवार- पाटण -पाटण बाजार समितीच्या निवडणूक निकालामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. बाजार समितीत सत्तांतर होणार नाही हे सत्ताधाऱ्यांच्यासह आमदार शंभूराज देसार्इंना देखील ज्ञात होते. तरीसुद्धा आमदार झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बलावर बाजार समितीत हात घालायला काय हकरत? या विश्वासाच्या जोरावर आमदार शंभूराज देसार्इंनी निवडणूक लढविली.
पाटणकर पिता-पुत्रांनी विधानसभेत काय घडलं बिघडलं हा विषय बाजूला ठेवून बाजार समितीची निवडणूक मनावर घेतली आणि मनावर घेतल्यावर काय होऊ शकते याची प्रचिती आली. त्यामुळे मोठ्या लाटेवर स्वार झालेल्या शंभूराज देसार्इंची पतंग या निमित्तानं का होईना जमिनीवर आली नव्हे तर ती काटली गेली व पाटणकरांच्या कपबशीतील चहा एकदमच लज्जतदार ठरला.
जशी देसाई साखर कारखान्यावर देसाई घराण्याची मजबूत पकड आहे तशीच माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांची तालुक्याच्या सहकारात आहे. येथे विधानसभा निवडणुकीचे निकष लागू होत नाही, तर जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपल्या तालुक्यातील संस्थेवर जर दुसराच कोणी चाल करून येत असेल तर मग दोन्ही नेते सर्व शक्तीनिशी जागे होतात. अशीच गत पाटण बाजार समितीच्या निवडणुकीत पाहावयास मिळाली. विधानसभेत १८८२४ मतांच्या लक्षणीय आघाडीमुळे हुरळून गेलेल्या विद्यमान आमदारांनी पाटण बाजार समितीसाठी अस्त्र बाहेर काढले.
यामागेही बाजार समितीच्या निवडणुका देसाई-पाटणकर गटात झाल्या होत्या. मात्र, यावेळेची लढाई वेगळीच होती. सत्ता येणार नाही याची पूर्ण खात्री आमदारांना होती पण ‘लढेंगे तो जितेंगे’ म्हणूनच कार्यकर्ते कामाला लागले. मग माजी आमदार गप्प बसतील तर नवलंच. २६ वर्षे सलग आमदारकी ताब्यात ठेवणारे विक्रमसिंह पाटणकर मूरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. देसार्इंचा बाजार समितीत शिरकाव झाला तर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील. या भावनेतून पाटणकर पिता-पूत्र जोमाने कामाला
लागले. समितीच्या परिणामामुळे पाटणकरांना पुढील आमदारकीसाठी चालना मिळाली आहे.
घोषणा फायद्याची ठरली
पाटण बाजार समितीसाठी सोसायटी, व्यापारी, ग्रामपंचायत, शेतकऱ्यांशी निगडित मतदारसंघाचा समावेश होता, हीच नाडी ओळखून विक्रमसिंह पाटणकर यांनी नव्या साखर प्रकल्पाची घोषणा बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर केल्याने ही घोषणा फायद्याची ठरली.
देसाई गटात नेत्यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांचा नाही
बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी संचालक, अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि व्यापारी यांचा समावेश होता. त्यामुळे अशा निवडक मतदारांपर्यंत पोहोचायचे म्हटल्यास देसाई गटाच्या कार्यकर्त्यांना ते शक्य झाले नाही.