खडकवाडी ग्रामस्थांनी घडवले एकजुटीचे दर्शन
By Admin | Updated: June 23, 2016 01:19 IST2016-06-22T23:56:37+5:302016-06-23T01:19:29+5:30
अडगळीतील आड गाळमुक्त: स्वच्छता करून पाणी टंचाईवर केली मात; नागरिकांसह मुलांचाही सहभाग
खडकवाडी ग्रामस्थांनी घडवले एकजुटीचे दर्शन
तारळे : ‘गाव करील ते राव काय करील’ याची प्रचिती खडकवाडी, ता. पाटण येथील ग्रामस्थांनी करून दिली आहे. ग्रामस्थांनी खर्चासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी अडगळीत पडलेल्या आडाची स्वच्छता करून करून पाणीटंचाईवर मात केली आहे. त्यामुळे आडातील सुमारे सहा फूट गाळ काढून जलस्त्रोत खुले केले आहेत.
वजरोशी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी खडकवाडी ही वाडी डोंगरावर वसली आहे. या वाडीला पाबळवाडी येथून ग्राव्हिटी पद्धतीने पाणीपुरवठा कण्यात येतो. दरवर्षी उन्हाळ्यात येथे पाणी टंचाईच्या झळा जाणवतात. पण यंदा पाणी पातळी खालवली आहे.
सरपंच सुशीला उफळे व सदस्य हरिश्चंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनखाली पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जुन्या आडातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी या कामासाठी पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली व लहान मुले, महिला , गावकरी जोमाने कामाला लागले व सुमारे सहा फूट गाळ काढून वाडीच्या खर्चाच्या पाण्यापासून सुटका केली.
प्रत्येक वेळी वाडीसाठी शासनाच्या टँकरची वाट बघत बसण्यापेक्षा सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयामुळे व वाडीतील लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे एक जलस्त्रोत खुला केल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर मात केली आहे. अशा प्रकारे वाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनीही
केला पाणीपुरवठा
वजरोशी, गावातील सत्यवान उफळे, सयाजी उफळे, पांडुरंग जगताप, शिवाजी रांजणे, शामराव उफळे, जगन्नाथ उफळे, अमीन मुलाणी, गणपती रांजणे, आनंदराव उफळे, अंकुश उफळे, नानासो उफळे या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारींचा गावाला पाणीपुरवठा केला आहे. यातील काहींनी बागायती पिकांकडे दुर्लक्ष करून गावासाठी पाणी दिले आहे.
खडकवाडी येथील गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आडातील गाळ काढून पाणीटंचाईवर मात केली आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. वजरोशी गावातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या बागायती पिकांचा विचार न करता गावाला मोफत पाणी दिले आहे. ही गावासाठी ही भूषणावह बाब असून, ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा उचित सत्कार करण्यात येईल.
- सुशीला उफळे,
सरपंच वजरोशी