राष्ट्रवादी आघाडी तोडणार याची कुणकूण होती
By Admin | Updated: September 28, 2014 00:33 IST2014-09-28T00:30:55+5:302014-09-28T00:33:44+5:30
कऱ्हाडात गौप्यस्फोट : अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यानी साधला पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादी आघाडी तोडणार याची कुणकूण होती
कऱ्हाड : ‘सत्तेची समीकरणे बदलण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे़ कोणी उघड-उघड, तर कुणी पडद्यामागून समीकरण बदलत असतो.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी मान्यवर नेत्यांसमोर उमेदवार उभे करताना काळजी घेतली आहे़ त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे का, याचा जनताच आता शोध घेईल,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला़ त्यानंतर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याबरोबरची आघाडी तोडायचीच होती़ त्यामुळे आसुरी महत्त्वकांक्षा ठेवून अशक्य अटी निवडणुकीपूर्वीच आमच्यावर लादण्याचा त्यांचा प्रयत्न होता़ त्याला प्रतिसाद देणे शक्यच नव्हते़ राष्ट्रवादी तर युतीच्या निर्णयाची वाट पाहत होती़ युती तुटली रे तुटली की, त्यांनी आघाडी तोडून टाकली; पण मला याची अगोदरच कुणकूण असल्याने त्याची काळजी वाटली नाही़ सत्तेसाठी आघाडी तुटली; पण सत्तेसाठी पुन्हा आघाडी होऊ शकते का? या प्रश्नावर मात्र अगोदर निवडणुका होऊ द्यात; मग त्या प्रश्नाचे उत्तर देऊ.’
पश्चिम महाराष्ट्रात सेना, भाजपची म्हणावी तशी ताकद नाही मग दोन्ही काँग्रेसपैकी हा गड कोण राखणार, असे विचारताच, ‘काँग्रेसची तयारी चांगली आहे़ त्यामुळे चिंता वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़
दक्षिणेत काँग्रेसविरुद्ध काँग्रेस असेच चित्र दिसतेय कारण फक्त अतुल भोसले भाजपात, अजिंक्य पाटील सेनेत, तर आमदार उंडाळकर बंडखोरीत दिसतायत ? याबाबत विचारले असता, ‘महत्त्वकांक्षेला कोणी आवर घालू शकत नाही़ ज्यांच्याकडे प्रचंड आर्थिक ताकद आली आहे, अशा प्रत्येकाला आता आमदार व्हावे, असे वाटत आहे़ मग ती अपक्ष राहतील, तर काही पक्षांची उमेदवारी ताकदीचा वापर करून मिळवतील; पण आता राज्यात राष्ट्रीय पक्षाचीच सत्ता असणे विकासाच्यादृष्टीने गरजेचे आहे़’
निवडणुकीत भाजप हाच आमचा प्रमुख विरोधक आहे़ कारण देशात त्यांचे सरकार आहे़ ११४ मतदारसंघांत आम्ही गेले दहा-बारा वर्षे लढलेलो नाही़ त्यामुळे तेथे उमेदवार निवडताना सामाजिक न्याय अन् सक्षम उमेदवार देताना थोडी कसरत करावी लागली एवढेच ! घोळ किंवा उमेदवार मिळत नव्हते, असं काहीही नाही़’ (प्रतिनिधी)