कऱ्हाडची वसुली ठप्प... ...भुर्इंजला मात्र सुरूच!

By Admin | Updated: December 2, 2015 00:42 IST2015-12-01T22:56:39+5:302015-12-02T00:42:39+5:30

बदल होणार का? : महामार्गावर धोकादायक पद्धतीने वसुली सुरुच

Karhad's recovery was done ... ... Bhurjang started only! | कऱ्हाडची वसुली ठप्प... ...भुर्इंजला मात्र सुरूच!

कऱ्हाडची वसुली ठप्प... ...भुर्इंजला मात्र सुरूच!

भुर्इंज : कराड परिसरात महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून सुरु असलेल्या धोकादायक वसुलीबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवताच तेथील तो सर्व प्रकार थांबला. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जाते, मात्र कऱ्हाडला बसलेली ही ठेच पाहून जोशीविहीर येथील भुर्इंज महामार्ग वाहतूक शाखा अजिबात शहाणी झाली नसून टाकेमाळ, वेळे आणि टोलनाका परिसरात धोकादायक पद्धतीने वसुली सुरूच असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महामार्गावरील वाहतूक सुरळीत असावी, यासाठी जोशीविहीर येथे वाहतूक शाखेची स्थापना करण्यात आली. मात्र प्रतिपोलीस ठाणे असल्याप्रमाणे या शाखेचा कारभाग गेली अनेक वर्षे सुरु आहे. वाहतूक सुरक्षा सप्ताह वगळता या शाखेचा सर्वसामान्य जनतेशी कधीच संपर्क येत नाही.
किंबहुना खंबाटकी बोगद्यातून चुकीच्या दिशेने येणारी दररोजची शेकडो वाहने थांबवणे, त्यांना समज देणे याबाबतही ही शाखा कधी जागृत नसते. त्यामुळेच काही दिवसांपूर्र्वी खंबाटकी बोगद्यात दोन लक्झरींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. महामार्ग वाहतूक शाखेचे कर्मचारी महामार्गावर मधोमध उभे राहून एमएच ११ वगळता इतर वाहने थांबवून वाहनचालकांना जेरीस आणत असल्याचे चित्र पाहायला मिळते. कागदपत्रे मागितली जातात. ती दिल्यानंतर इतर काही तरी किरकोळ कारणे काढून वाहनचालकांशी वाद घातला जातो. बहुतेकदा यांचा डोळा हा परप्रांतीय ट्रकचालकांवर असतो. मुळातच वाहतूक शाखेला नेमके काय अधिकार आहेत, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, एवढेच यांचे काम असताना वसुलीच्या आविर्भावात हे लोक महामार्ग आपल्या मालकीचा असल्याच्या थाटात वावरत असून महामार्ग पोलिसांच्या कर्तव्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्टता करावी, तसेच टाकेमाळ, वेळे आणि टोलनाका या परिसरातील त्यांचे अड्डे नेमके कशासाठी आहेत, याचा खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
कराड परिसरातील वाहतूक शाखेला दणका बसल्यानंतरही भुर्इंज येथील वाहतूक शाखा शहाणी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून स्थानिकांना या शाखेचा त्रास नसला तरी परप्रांतीय वाहने अडवून महामार्गावर केल्या जात असलेल्या अडवणुकीचा सर्वांनाच त्रास होत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)


वसुलीवर डोळा... बेशिस्तीकडे कानाडोळा!
वास्तविक सध्या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत महामार्ग वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर वाहतूक कशी सुरक्षितपणे व सुरळीतपणे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र तसे घडताना दिसून येत नाही. वाहतूक शाखा फक्त वसुलीवर नजर ठेवून असल्याने महामार्गावरील वाहतूक बेशिस्तपणे सुरु आहे.

Web Title: Karhad's recovery was done ... ... Bhurjang started only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.