कऱ्हाडातील आयलँडचे सुशोभिकरण हवे.!
By Admin | Updated: May 3, 2017 23:20 IST2017-05-03T23:20:25+5:302017-05-03T23:20:25+5:30
कऱ्हाडातील आयलँडचे सुशोभिकरण हवे.!

कऱ्हाडातील आयलँडचे सुशोभिकरण हवे.!
कऱ्हाड : शहरात अधिकाधिक विकास व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने येथील पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून चकाचक केले जात आहेत. मात्र, शहरातील चकाचक रस्त्यांवरील पाच आयलँड हे अजूनही सुशोभिकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा केवळ जाहिरातीसाठीच वापर केला जात आहे.
कऱ्हाड शहरातील मुख्य पाच ठिकाणी पालिकेकडून त्रिकोणी तसेच गोलाकार आकाराचे आयलँड बांधण्यात आले. शहरातील सौंदर्यात भर पडावा व चौकांना सौंदर्य प्राप्त व्हावे हाच केवळ उद्देश त्यावेळी पालिकेने समोर ठेवला होता. आयलँड बांधल्यानंतर त्याची सुरुवातीला नियमितपणे डागडुजी व फुलझाडांची निगाही राखण्यात आली. नियमित पाणी घालून आयलँडची निगा राखण्याकडे पालिका लक्ष देत होती. आता मात्र, पालिकेने या आयलँडच्या डागडुजीबरोबर फुलझाडांकडेही दुर्लक्ष केले आहे.
शहरात सध्या कोल्हापूर नाका, दत्त चौक, पंचायत समिती चौक, कृष्णा नाका तसेच कामगार चौक या पाच ठिकाणी गोलाकार व त्रिकोणी आयलँड आहेत. त्यांची अवस्था ही असून अडचण आणि नसून खोळंबा, अशी झाली आहे. या आयलँडचे संरक्षक कठडे, जाळी तुटलेली असून, गवतही वाळले आहे. तसेच फुलझाडेही नाहीशी झाली आहेत. दिवसाढवळ्या शहरातील मोकाट जनावरे या आयलँडमधील वाळलेले गवत खात आहेत. तर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीमुळे शहरात येणाऱ्या नागरिकांकडून व प्रवाशांकडून या आयलँडच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
१९९९ नंतर शहरातील सुधारणेकडे पालिकेकडून लक्ष देण्यास कार्यवाही सुरू करण्यात आली. शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, शहरातील चौकातील आयलँडचे सुशोभिकरण करणे, दुभाजकावरती फुलझाडे लावणे तसेच पादचारी मार्गांची निगा राखणे अशी कामे पालिकेकडून शहरात करण्यात आली. त्याअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आकर्षक आयलँड उभारण्यात आली.
कोल्हापूर नाका येथे शहराच्या प्रवेशद्वारावर त्रिकोणी आकाराचे आयलँड बांधण्यात आले. त्याची अवस्था आता अत्यंत बिकट बनली आहे. या ठिकाणी असलेल्या आयलँडची डागडुजी करण्यात येणार असल्याचे सुरुवातीला पालिकेकडून सांगण्यात आले होते. आता मात्र, आयलँडकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यापेक्षा गंभीर परिस्थिती दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आयलँडची झाली आहे. दगडी बांधकाम करण्यात आलेल्या या आयलँडमध्ये पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाईप तसेच जॅकवेल बसविण्यात आलेल्या आहेत. या आयलँडमधील जॅकवेलचे काम काही महिन्यांपूर्वी पालिकेकडून करण्यात आले. कामासाठी या ठिकाणी आयलँडचे संरक्षक कठडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा संरक्षक कठड्यांची डागडुजीही कर्मचाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे आयलँडचे कठड्याचे दगड रस्त्यावर ढासळले असून, ते वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत.
याप्रमाणे शहरातील कृष्णा नाका व कामगार चौकातील आयलँडच्या संरक्षक जाळ्यांना गंज चढला असून, त्यातील गवतही वाळले आहे. तसेच फुलझाडेही नाहीशी झाली आहेत. कामगार चौकातील आयलँड तर वडापवाहनांच्या गराड्यात अडकला आहे. याच्या चोहो बाजूने वडापच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. तर पंचायत समिती परिसरात रेव्हिन्यू क्लबसमोर बांधण्यात आलेल्या आयलँडवर तर बिनधास्तपणे जाहिरातींचे फलक अडकवून जाहिरातींची प्रसिद्धी केली जात आहे. अशा प्रकारे शहरातील आयलँडची दुरवस्था झाली असून, त्याकडे पालिकेक डून दुर्लक्ष केले जात आहे. या आयलँडची दुरुस्ती करून पालिकेने शहरातील सौंदर्य वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)