सर्व शेतकऱ्यांना बिलांचा एकच आकडा
By Admin | Updated: September 15, 2014 00:12 IST2014-09-14T20:34:57+5:302014-09-15T00:12:11+5:30
महावितरणचा अजब कारभार : कृषिपंपांना सरसकट ६३९ युनीटचे बिल

सर्व शेतकऱ्यांना बिलांचा एकच आकडा
औंध : खटाव तालुक्यात पावसाचा अधून-मधून शिडकावा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांची गरज नसताना अव्वाच्या सव्या बिल येऊ लागले आहेत. तीन अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना सरसकट ६३९ युनीट व पाच अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना १,०६५ युनीट आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गोपूज परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औंध उपविभागाच्या गोपूज आणि परिसरातील शेतकरी कृषिपंप वापरत आहेत. कृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. ज्यांच्या मीटरमध्ये अजून ६३९ रिडिंंगच झालेले नाही.
त्यांनाही चक्क ६३९ युनीटप्रमाणे बिलाची आकारणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या नवीन जोडणीच्या मोटारी बसवल्याच नाहीत त्यांनाही बिल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
वीजवितरण कंपनीने कृषिपंपाचे बिल दिलेल्यामध्ये मीटर रिडिंगचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे आलेले बिल व प्रत्यक्षात झालेला विजेचा वापर यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना की वीजवितरण कंपनीला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
आयोगाकडून येणाऱ्या अनुदानासाठी सर्वांना एकसारखी बिले देऊन वीजवितरण कंपनीने त्यांच्यात तारतम्य नसल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे, असाही आरोप शेतकरी करत आहेत.
चालू रिडिंगप्रमाणे बिले दिल्यास ते भरण्यास तयार आहेत. मात्र, न वापरलेले विजेचे बिल भरणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे.
पत्रकावर दत्तात्रय घार्गे, नितीन घार्गे, विनोद पाटील, नितीन शिंदे, सुनील कुलकर्णी, मोहन खराडे, नारायण घार्गे, महादेव जाधव, संजय चव्हाण आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)