‘संथारा’साठी एकवटले जैन बांधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2015 23:14 IST2015-08-24T23:14:26+5:302015-08-24T23:14:41+5:30
विविध संघटनांचा पाठिंबा : धार्मिक आचरणावर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा फेरविचार करण्याची मागणी

‘संथारा’साठी एकवटले जैन बांधव
फलटण : ‘संथारा’ (सल्लेखना) या जैन धर्मातील पवित्र व्रताचा आत्महत्येशी संबंध जोडून, या व्रतावर निर्बंध लादण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी येथील सकल जैन समाजाने सोमवारी सर्व व्यवहार बंद ठेवले. तसेच मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व व्यावसायिक व संस्था, संघटनांनी उत्स्फूर्तपणे आपले व्यवसाय बंद ठेवून जैन समाजाला पाठिंबा दिला.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर संपूर्ण देशभर जैन समाजामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली; तथापि पूर्णत: विवेकी आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या या समाजाच्या वतीने सोमवारी (दि. २४) देशभर एकाच दिवशी मूक मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आणि सर्वदूर या निर्णयाची माहिती पोहोचविण्यात आल्यानंतर जैन बांधवांनी आपले व्यापार व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा काढला.
फलटण शहर व तालुक्यात या आंदोलनासंबंधी बैठका घेऊन सकल जैन समाजाला राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय तसेच ‘संथारा’ व्रतासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर जैन समाजातील विविध साधू, साध्वी यांची याबाबतची मते समजावून देण्यात आली.
जैन धर्मियांसमवेत अन्य धर्मियांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आपले व्यापार व्यवहार बंद ठेवल्याने सोमवारी फलटण शहरात संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. शहर व तालुक्यातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनीही या आंदोलनात सहभागी होत पठिंबा व्यक्त केला. आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक हेमंत निंबाळकर, किशोर ऊर्फ गुड्डू पवार, डॉ. जे. टी. पोळ, शांतिनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक मेथा यांच्यासह फलटण व्यापारी संघटना, फलटण तालुका आडत व्यापारी असोशिएशन, नेहरू गणेशोत्सव मंडळ, शेतवाल जैन समाज, जैन सोशल ग्रुप, फलटण लायन्स क्लब, नाभिक संघटना, फलटण सराफ असोसिएशन, फलटण शहर रिक्षा संघटना आदी संस्था व संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
आदिनाथ दिगंबर जैन मंदिरापासून सकाळी ९ वाजता निघालेल्या या मोर्चात फलटण शहर व तालुक्यातील सर्व जैन धर्मीय संपूर्ण कुटुंबांसह सहभागी झाले होते. मोर्चा आदिनाथ मंदिर, शुक्रवार चौक, शंकर मार्केट, छत्रपती शिवाजी वाचनालय, शिंपी गल्ली, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर स्तंभ या मार्गाने अधिकारगृह इमारतीपाशी पोहोचला.यानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अनुप शहा यांनी निवेदन वाचून दाखविल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ते तहसीलदार विवेक जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. (प्रतिनिधी)