साताऱ्यात घुमला ‘जय मल्हार’
By Admin | Updated: July 15, 2014 01:06 IST2014-07-15T00:53:27+5:302014-07-15T01:06:36+5:30
धनगर समाज : अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा

साताऱ्यात घुमला ‘जय मल्हार’
सातारा : एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबाजावणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात धनगर समाज पारंपरिक वेशभूषा, गजीढोल व मेंढ्यांसह सहभागी झाला होता. दरम्यान, आमच्या आरक्षणावर तातडीने निर्णय न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
बसस्थानकापासून दुपारी बारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. पोवई नाक्यावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात मागणी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाज मागील सुमारे ६५ वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबाजवणीपासून वंचित आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश असूनही केवळ राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस न केल्यामुळे या समाजाला सवलतीचा लाभ मिळत नाही. वेळोवेळी आंदोलने करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या संपूर्ण राज्यात धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी शासानाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, बाळासाहेब खरात, रामदास सरगर, अशोक शेडगे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)