‘जय जवान’ चा नारा नेरवर घुमला
By Admin | Updated: April 26, 2016 00:22 IST2016-04-25T22:16:31+5:302016-04-26T00:22:34+5:30
खटाव तालुका : दुष्काळग्रस्त किसानांच्या मदतीला भारतीय जवान दाखल; तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

‘जय जवान’ चा नारा नेरवर घुमला
पुसेगाव : ‘जय जवान जय किसान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत खटाव तालुक्यातील नेर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ आपल्या डोजरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी केला. खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भारतीय जवान दाखल झाले असून, त्यांच्या हाताला हात लावण्यासाठी शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब यांच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या बाँम्बे सेपर्स विभागाचा एक डोजर, नायक दर्शन खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार सचिन गायकवाड हे नेर येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दाखल झाले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जय जवान जय किसान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गोडसे, निवृत्त कर्नल राजेंद्र घाडगे, सुजित आंबेकर, संजय बोराटे, विद्याधर ताटे, विजय ताटे, विलासराव घाडगे, शिवाजीराव पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘१८७२ ला नेर तलावाची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून आजतागायत या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब आणि भारतीय सैन्यदल यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू झाले आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या तलावातील गाळ काढल्यामुळे निश्चितच पाण्याचा साठा वाढेल. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकावा, शेतामध्ये सुपीकता वाढेल. परिणामी शेती उत्पादनात वाढ होईल. भारतीय सैन्यदल आपल्या मदतीसाठी आले असून, त्यांच्या या कामामध्ये आपणही सर्वजण सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी या तलावातून काढण्यात येणारा गाळ विनामूल्य आपल्या स्वत:च्या वाहनातून घेऊन जावा.’ असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
जिल्हाधिकारी मुदगल यांनी नायक खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार नितीन गायकवाड यांचा सत्कार केला. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे..
प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोडसे म्हणाले, ‘नेर तलावातील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रीन थंबचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे. भारतीय सैन्य दलाला ज्यावेळी जवानांची गरज लागली त्यावेळी या गावातून, परिसरातून मोठ्या प्रमाणात जवान सैन्य दलात दाखल झाले. आज हे जवान निवृत्त झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी नेर तलावातील गाळ काढण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. परिसरातील सर्व शेतकरी, निवृत्त जवान, युवावर्ग यांनी या कामामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’