वृत्ती बदलण्यास परमार्थ समजणे योग्य
By Admin | Updated: January 23, 2015 00:39 IST2015-01-22T23:54:17+5:302015-01-23T00:39:54+5:30
चिन्मय महाराज : महोत्सवातील चौथ्या पुष्पात कीर्तनाने भाविक भारावले

वृत्ती बदलण्यास परमार्थ समजणे योग्य
कऱ्हाड : ‘जग समजून घेताना माणसाने अगोदर स्वत:ला समजून घेतले पाहिजे, त्यासाठी स्वत:ची वृत्तीे बदलणे गरजेचे आहे़ परमार्थाच्या नामस्मरणाबरोबरच ज्ञानेश्वरीचा अर्थाऐवजी त्यातील भाव समजून घ्या,’ असे विवेचन चिन्मय महाराज यांनी यशवंत महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात बुधवारी उपस्थित भाविकांना पटवून सांगितले.
यशवंत को-आॅप. बँकेच्या वतीने आयोजित पाचव्या कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवशीच्या पुष्पात त्यांनी सुश्राव्य कीर्तन केले. या कीर्तनास भगवती महाराज उपस्थित होत्या.
चिन्मय महाराजांनी आपल्या कीर्तनातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सांप्रदायामध्ये किती ताकद आहे़ याविषयी उदाहरणासह आपल्या अभंगातून समजावून सांगितली़ ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून संताना एकत्र करून सांप्रदाय स्थापन केला़ तसेच ज्ञानेश्वरीतून सांप्रदायाचे महत्त्व काय, हे साऱ्या जगासमोर मांडले.’
‘भिती संपली, आता नाही राहिला दुरावा’, ‘असा भाव समजुनी, तुम्ही-आम्ही घ्यावा!’ भीती असते तेव्हा दुरावा असतो, जेव्हा भीती संपते, तेव्हा दुरावाही संपतो़ त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भाविकांशी त्यांचा असलेला दुरावा दूर केला आहे. एका अंधाला ज्ञानेश्वरी वाचावयाची होती तेव्हा त्याने ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने त्या ज्ञानेश्वरीला स्पर्श करून त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यावेळी त्याला तो अर्थ उमगला नाही. ज्यावेळी त्या अंधाने ज्ञानेश्वरीतील भाव समजून घेतला तेव्हा ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडपाठ झाली.’
अशा उदाहरणांच्या साहाय्याने चिन्मय महाराजांनी उपस्थितांना ज्ञानेश्वरीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (प्रतिनिधी)