अवैध दारू विक्री फोफावली... सुशिक्षित तरुणाई बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST2021-03-22T04:34:52+5:302021-03-22T04:34:52+5:30
कातरखटाव : मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचा फायदा घेत पडळ, कारखाना स्थळ, एनकूळ, बनपुरी, बोंबाळे या परिसरातील ...

अवैध दारू विक्री फोफावली... सुशिक्षित तरुणाई बिघडली
कातरखटाव : मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचा फायदा घेत पडळ, कारखाना स्थळ, एनकूळ, बनपुरी, बोंबाळे या परिसरातील खेड्यापाड्यात दारू व्यवसाय फोफावला आहे. चोरीचोरी-चुपकेचुपके कुठेही दारू मिळू लागल्यामुळे तरुणाई व्यसनाकडे वळत आहे. प्रशासनाने अवैध दारू विक्रेत्यांना लगाम घालण्याची मागणी होत आहे.
कोरोनाने वर्षभर गावोगावी पाय पसरले आहेत. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले. कातरखटावसह परिसरात तळीराम दारू विकून मोकळ्या बाटल्या राजरोसपणे कुठेही फेकत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वयोगट न पाहता तळीराम कुणालाही दारू विकू लागल्यामुळे ऐन तारुण्यात युवक अधिकच गुरफटू लागला आहे. यामुळे पैसे, वर्चस्वाचा वाद, राजकारणातून मारामारी, भाऊबंदकी, मौजमजेसाठी चोऱ्या केल्या जात आहेत. कमी वयात पैसा आल्यामुळे तरुणाई वाईट मार्गाकडे वळलेली दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात तरुण जास्त प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत. नंतर गरजा पूर्ण करण्यासाठी मटका किंवा अवैध मार्ग अवलंबताना दिसत आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्यानंतर जनजीवन, आर्थिक घडी कोलमडली असताना, या काळात उद्योगधंदे बंद होते. त्यावेळी ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्री वाढली. कमी वेळात दुप्पट पैसा मिळू लागल्यामुळे अनेक मद्यपींचे अड्डे माळरानात, शेतात सुरू झाले.
कोट
वाढत्या वयात व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मुलांचे मार्ग बदलून जातात. प्रतिष्ठा ढासळल्यामुळे समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांच्याकडे सहजरित्या बोट दाखवले जाते. त्यामुळे बहुतेकवेळा सुधारण्याऐवजी गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढतो.
- आनंदराव बागल,
ज्येष्ठ नागरिक, कातरखटाव
चौकट
मानसिक संतुलनावर परिणाम
शारीरिक, मानसिक संतुलन बिघडणे या दोन्हीवर परिणाम होऊन भवितव्य अंधारात राहणार आहे. या प्रवाहात गेल्यामुळे शिक्षणाची लिंक तुटत जाणार आहे. मुलांची पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होत नाही. यातून बाहेर पडणे अवघड होत जाते.
- डॉ. एन. ए. मोहिते,
कातरखटाव
२०कातरखटाव
कातरखटाव परिसरातील शेतात, माळरानात, इतरत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या जात आहेत. (छाया : विठ्ठल नलवडे)