ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:58+5:302021-09-08T04:46:58+5:30
सातारा : जिल्ह्यात तब्बल १३ लाखांहून अधिक जणांनी लसीचे डोस घेतले आहेत. मात्र, तरीही अनेक जण लस खरी की ...

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी
सातारा : जिल्ह्यात तब्बल १३ लाखांहून अधिक जणांनी लसीचे डोस घेतले आहेत. मात्र, तरीही अनेक जण लस खरी की खोटी, याबाबत साशंक आहेत. त्याचे कारण म्हणजे लस घेतल्यानंतर अनेकांना ताप येत नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम अधिकच दिसून येतो; पण साशंक राहण्यापेक्षा डाॅक्टरांचही म्हणणे ऐका असे म्हणण्याची वेळ आलीय.
कोरोनाला आटकाव घालायचा असेल तर लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे प्रशासन सांगत आले आहे. त्यामुळे एकीकडे लस घेण्यासाठी चढाओढ दिसत असली तरी दुसरीकडे लसीबाबत अद्यापही अनेकांच्या साशंकता आहे. ही साशंकता कशामुळे निर्माण झाली तर ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यांच्यामुळे झाली असल्याचे समोर येतेय. अनेकांना पहिला डोस घेतला. त्यावेळी ताप किंवा अंगदुखीची कसलीही लक्षणे जाणवली नाहीत. परिणामी, या लोकांनी घेतलेली लस खोटी होती की काय, अशी शंका येऊ लागली; पण ही शंका व्यर्थ असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
चाैकट : कोविशिल्डचा त्रास अधिक
जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस उपलब्ध आहेत. यापैकी कोविशिल्ड ही लस खूपच प्रभावी आहे. त्यामुळे अनेकांना ही लस घेतल्यानंतर त्रास झाला. ही लस घेण्याचे आणखी एक कारण समोर आलेय ते म्हणजे भविष्यात परदेशात जायचे म्हटले तर कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे ही लस घेण्याकडे अनेकांचा ओढा आहे.
चाैकट : लसीनंतर काहीच झाले नाही...
दोन महिन्यांपूर्वी कोविशिल्ड लस घेतली. मात्र, मला कसलाही त्रास झाला नाही. एवढेच नव्हे तर जिथे लस टोचली ती जागाही दुखली गेली नाही. त्यामुळे एकवेळ मनात असे आले, लसीचा डोस दिला की केवळ पाणी दिले.
-सूरज माने, यादोगोपाळ पेठ, सातारा
चाैकट : डोस घेतल्यानंतर अनेक जण ताप येईल, असे सांगत होते म्हणून भीती वाटत होती; पण प्रत्यक्षात लस घेतल्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही. त्रास होईल म्हणून पॅरासिटीमाॅल या गोळ्या घेऊन ठेवल्या होत्या. मात्र, त्याची गरज भासलीच नाही.
-प्रदीप जाधव, शाहूपुरी, सातारा
कोट : त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही...
तसे पाहिले तर प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामधील प्रतिकारशक्तीचेही तसेच असते. काहींना डोस घेतल्यामुळे त्रास होतो. तर काहींना होत नाही. याचा अर्थ त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही.
-डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा