हुश्श... रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: January 23, 2015 00:42 IST2015-01-22T23:47:47+5:302015-01-23T00:42:20+5:30
आज मुदत संपली : रस्ता खोदण्याचे काम बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश; रस्ते खोदण्यास पुन्हा परवानगी नाही

हुश्श... रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
सातारा : सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सध्या शहरात रस्ते खुदाई सुरू होती. मात्र, रस्ते खुदाईची मुदत शुक्रवारी पहाटे सहा वाजता संपल्याने शहरातील रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून शहरात सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिसूचनेनुसार रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत रस्ते खुदाईसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न येत नव्हता; परंतु रात्री खोदलेले रस्ते दिवसा उजाड आणि भकास दिसत होते. तसेच रस्त्यांमध्ये चर काढल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही होत होती. रस्त्यामधील चर मुजविल्या असल्या तरी दगड आणि माती रस्त्यावरच पडलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. पुन्हा-पुन्हा रस्ते खोदण्यापेक्षा एकदाचेच काही ते काम करून घ्या, अशी सातारकरांची मानसिकता झाली होती. त्यामुळे अशा खडतर रस्त्यातूनही सातारकरांनी नाईलाजास्तव संयम ठेवला. या पुढील काळात आता चांगले आणि चकाचक रस्ते मिळणार असल्याने खड्ड्यांचेही स्वागत नागरिकांनी हसतमुखाने केले. (प्रतिनिधी)
कोणत्याही परिस्थितीत पुन्हा रस्ते खोदता येणार नाहीत
सातारा : नळ कनेक्शन असो किंवा इतर कोणतीही रस्त्यांची कामे असो, रस्त्यांच्या डांबरीकरणानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा रस्ते खोदू नयेत, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गुरूवारी दुपारी नगरपालिकेत आले होते. ते म्हणाले, जाहिरात फलक व स्वागत कमानींमुळे रस्त्यांना पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे डांबरीकरण झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रस्ते खुदाईला परवानगी दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत नवीन नळ कनेक्शन दिले जाणार नाही.’ पालिका जागा निश्चित करुन देईल अशाच ठिकाणी जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार आहे. तीन दिवसांपेक्षा अधिक काळासाठी जाहिरात ङ्खफलकांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)
३६ कनेक्शन जोडली
सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामामध्ये आत्तापर्यंत ३६ नवीन कनेक्शन जोडण्यात आली आहेत. रस्ता खुदाईसाठी २२ जानेवारीची डेडलाईन असल्यामुळे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंतच खुदाईची मुदत आहे. अजून १४ कनेक्शन जोडायची आहेत. त्यामुळे रात्रभर काम करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी
पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.