कशी दुष्काळानं थट्टा तमाशा फडात मांडली !
By Admin | Updated: April 22, 2016 01:03 IST2016-04-21T22:26:07+5:302016-04-22T01:03:21+5:30
काळजनगरी सुपारीच्या प्रतीक्षेत : राहुट्या उभारून कलाकार पाहतायत यात्रा कमिटीची वाट

कशी दुष्काळानं थट्टा तमाशा फडात मांडली !
सचिन गायकवाड- तरडगाव --भयावह दुष्काळ रद्द झालेल्या अनेक गावांच्या यात्रा, कमी बिदागीत करावे लागणारे कमी खेळ, यातून कलावंताचे द्यावे लागणारे मानधन, घेतलेल्या कर्जाची परतफेड या साऱ्यांचा मेळ घालताना फड मालकांची फरकट होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तर यात्रा हंगामात तमाशा कलेची पंढरी म्हणून नावारूपास आलेली काळजनगरी जरी तमाशा मंडळांच्या राहुट्यांनी बहरली असली तरी यात्राकमिटी सदस्यांच्या प्रतीक्षेत असलेले फड मालकाचे चेहरे मात्र हिरमुसले आहेत.
सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू आहे. ग्रामदैवताची यात्रा म्हटलं की, मनोरंजनाचा कार्यक्रम हा आलाच. कार्यक्रमासाठी गावोगावच्या यात्रा कमिट्यांना भटकंती करावी लागू नये, यासाठी फलटण तालुक्यातील काळज येथे अनेक वर्षांपूर्वी तमाशा केंद्र उभारण्यात आले. त्यानुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात अनेक तमाशा मंडळे येथे दाखल झाली आहेत.
यंदापेक्षा गेल्यावर्षी दुष्काळाची दाहकता कमी प्रमाणात होती. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकादेखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे तमाशा केंद्रातील फडमालकांना बऱ्यापैकी व्यवसाय झाला होता; परंतु यावर्षी दुष्काळ प्रचंड जाणवत आहे. गेल्यावर्षी केंद्रात दाखल झाल्यावर दहा दिवसांत जवळपास १५ ते २० खेळ प्रत्येक तमाशा मंडळास मिळाले होते. मात्र, यंदा ७ ते ८ खेळ कसेबसे कमी दरात ठरले गेल्याची खंत अनेक तमाशागिरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
तमाशा केंद्रात सकाळी ९ ते १२ पर्यंत तुरळक गर्दी तमाशा ठरविण्यासाठी आलेल्या यात्राकमिटी सदस्यांची दिसते. दुपारच्या सुमारास पूर्णत: शुकशुकाट जाणवतो.
तर सायंकाळी पुन्हा पाचनंतर तमाशा खेळाच्या सुपाऱ्यांचा अंदाज घेण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. लहान तमाशा मंडळाचा दोन खेळांचा दर हा ४० ते ५० हजारांपर्यंत आहे. मोठ्या मंडळाच्या दोन खेळांचा दर ७० ते ८० हजारांपर्यंत आहे.
नामवंत तमाशा मंडळाचा दोन खेळांचा दर हा लाखापर्यंत सांगितला जात आहे. तमाशा ठरविण्यासाठी आलेले यात्रा कमिटी सदस्य हे तमाशा खेळासाठी सांगितलेल्या दराच्या निम्म्या रकमेपासून बिदागीची बोली सुरू करीत असल्याने फड मालकांसमोर मोठा पेच पडत आहे. नकार द्यावा तर खेळाची सुपारी माघारी जाईल. यामुळे शेवटी चर्चेतून तोडगा काढून काही ठराविक रकमेपर्यंत बिदागी ठरवून खेळाची निश्चिती केली जात आहे.
यंदा काही नवीन तमाशा मंडळे केंद्रात दाखल झाली आहेत. तमाशा मंडळास चांगला नावलौकिक मिळावा, कलावंतांचे पगार वेळच्या वेळी देता यावेत, यासाठी स्वत:च्या पोटाला चिमटा घेत कर्ज काढून आपला लवाजमा सांभाळणाऱ्या फड मालकास चांगला व्यवसाय न मिळाल्यास कर्ज फेडताना त्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दुष्काळाचा परिणाम तमाशाच्या फडांवरही दिसत आहे.
तसेच सध्या सुरू असलेल्या यात्रांचा हंगाम हा अक्षयतृतीयेपर्यंत हा मोठ्या प्रमाणात असतो. तो पर्यंत ही तमाशा मंडळे केंद्रात दिसतात. त्यानंतर काही दिवस मोजकीच तमाशा मंडळे येथे पाहावयास मिळतात. यामुळे पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये चांगले खेळ मिळून परिस्थिती सुधारेल एवढीच अपेक्षा धरून येणाऱ्या नैसर्गिक संकटास तोंड देत ही
तमाशा मंडळे उभी असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखविली.
तमाशा मंडळात ४० ते ५० कलावंताचा संच असतो. प्रत्येक कलावंत हा ३० ते ३५ हजारांपर्यंत पगार घेतो. पगारातील काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून त्यांना अगोदर द्यावी लागते. घरच्या माणसाप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा लागतो. दुष्काळामुळे अनेक गावच्या यात्रा रद्द झाल्याने व कमी बिदागीत खेळ करावे लागत असल्याने फड मालकांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने दुष्काळाच्या पॅकेज स्वरूपात मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
-गंगाराम पवार, संचालक, आशा तरडगावकरसह
उषा सांगवीकर तमाशा मंडळ
हिंदी, मराठी गाण्यांवर नाचून मनोरंजन करणारे आॅर्केस्ट्रा खेळ कमी दरात मिळत असल्याने तमाशा फडमालक अडचणीत येऊन वगनाट्यातून प्रबोधन करणाऱ्या व महाराष्ट्राची लोककला समजली जाणारी ‘तमाशा’ कला लोप पावत असल्याची भीती व्यक्त केली जात असून, तमाशा व कलावंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
- आनंद भिसे-पाटील निंभोरेकर, फडमालक