सिद्धनाथवाडीत घरटी डेंग्यूचा रुग्ण
By Admin | Updated: September 21, 2016 00:00 IST2016-09-20T23:13:40+5:302016-09-21T00:00:58+5:30
साथीचे थैमान : उपचार करण्यासही दवाखान्यांमध्ये पुरेना जागा; पालिकेने तातडीने उपाय करण्याची मागणी
सिद्धनाथवाडीत घरटी डेंग्यूचा रुग्ण
वाई : शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. सिद्धनाथवाडीसह संपूर्ण शहरात प्रत्येक घरात डेंग्यूचे रुग्ण आहेत. सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यात रुग्णांना उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नाही.
शहरातील सर्वच दवाखाने तुडुंब भरलेले आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, कचऱ्यातून मोकाट जनावरे बिनधास्त वावरताना दिसतायत.
हे चित्र ‘स्वच्छ वाई, सुंदर वाई’त पाहावयास मिळते, ही गंभीर बाब आहे. आरोग्य विभाग यााबाबत अनभिज्ञ आहे. या विभागाकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
सरकारी दवाखान्यात लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. रुग्णांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. शासकीय दवाखान्यात डॉक्टरांची कमी असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
आरोग्य विभागाने त्वरित यावर उपाय करून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सिद्धनाथवाडीत गेल्या महिन्यापासून डेंग्यू साथीने थैमान घातले आहे. वाईचे माजी नगराध्यक्षही यातून सुटलेले नाहीत. नगरपालिका सध्या फक्त शोपीस बनली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवकांना लोकांचे काहीही देणे-घेणे नाही. शहराच्या प्रत्येक प्रभागात अतिशय दयनीय अवस्था आहे.
शहरातील गटारांची स्वच्छता वेळेवर होत नाही. त्यात कसल्याही पद्धतीची औषध फवारणी केली जात नाही. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे.
शहरातील घन कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. उचललेला कचरा टाकावयाचा कुठे हा प्रश्न पालिका कर्मचाऱ्यांना पडला आहे. गणेश विसर्जनानंतर दोन दिवस कचरा उचलला नाही. वाहन नादुरुस्त व कचरा टाकण्यास जागाच नाही, असे कारण सांगितले जात होते. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत होत असल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)
चिकनगुनियाही काढतोय डोके वर
वाई तालुक्यात एक ते दोन महिन्यांपासून चिकनगुनिया व डेंग्यूचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य विभागातील डॉ. अजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘बाह्यरुग्ण कक्षेत डेंग्यूचे सहा ते आठ रुग्ण असतील तर चिकनगुनियासदृश्य तीस ते चाळीस रुग्ण आहेत. चारशे ते साडेचारशे रुग्ण आहेत. यामध्ये मुंबई-पुणेचे पन्नास टक्के रुग्ण आहेत.
चिकनगुनियाची लक्षणे
गंगापुरीत चिकनगुनिया साथीची लागण सुरू झाली असून आता धर्मपुरी, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी अशा बऱ्याच भागांमध्ये याची लागण झालेली आहे. यामध्ये रुग्णाला ताप येणे, पूर्ण अंग दुखणे, गुडघे दुखी, जॉइंट दुखणे, अंगावर लालसर पुरळ उटणे, पायांना सूज येणे ही लक्षणे आढळतात. अस्वच्छ पाण्याच्या साठ्यामुळे जंतूपासून डास तयार होतो.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूच्या रुग्णामध्ये अंगदुखी, ताप येणे, सलग तीन दिवस ताप येतो, डोके दुखणे, उलट्या, अपचन अशी लक्षणे दिसतात. यासाठी वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. त्याबरोबर डाळिंब, पपईच्या पानाचा रस, किवी या फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. जास्त दिवस ठेवलेल्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामुळे डेंग्यू होतो.