वीज कंपनीवर जोरदार आगपाखड

By Admin | Updated: November 12, 2014 23:33 IST2014-11-12T21:59:53+5:302014-11-12T23:33:20+5:30

नुकसानीला जबाबदार कोण ? : फलटण पंचायत समिती मासिक बैठक

Heavy air traffic on the electricity company | वीज कंपनीवर जोरदार आगपाखड

वीज कंपनीवर जोरदार आगपाखड

फलटण : शेती पंपासाठी भारनियमनाचा कालावधी वाढविल्याने तसेच चोरीस गेलेले किंवा बंद पडलेले वीज ट्रान्सफॉर्मर वेळेत बदलले जात नाहीत. बदललेले ट्रान्सफॉर्मर पुन्हा बंद पडत असल्याने पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी पिके वाया जाण्याची धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल पंचायत समितीच्या मासिक बैठकीत धनंजय साळंखे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या वीजवितरण कंपनीच्या आढाव्यादरम्यान वीज ग्राहकांची होत असलेली कुचंबणा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती स्मिता सांगळे होत्या. बैठकीस उपसभापती पुष्पा सस्ते यांच्यासह नऊ सदस्य उपस्थित होते.
वीजवितरण कंपनी जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत बदलून देत नाही. त्याचबरोबर डीपीचे फ्यूज सुध्दा संबंधित शेतकऱ्यांना वर्गणी काढून बसवावे लागत आहेत. अन्य विजेच्या तक्रारीबाबतही संबंधित अधिकारी योग्य दखल घेत नाहीत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना देऊन शेतकरी व वीज ग्राहकांची अडवणूक व नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी धनंजय साळुंखे-पाटील यांनी केली.
जळालेले अथवा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर चार-पाच दिवसांत बदलण्यात येत आहेत. शेतीपंपासाठी पूर्वी दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज उपलब्ध करून दिली जात असे. आता दिवसा सात व रात्री आठ तास वीज उपलब्ध होत आहे.
विजेची मागणी वाढल्याने शेतीपंपाचा भारनियमन कालावधी वाढला आहे. घरगुती वापराच्या विजेसाठी मात्र भारनियमन सध्या तरी केले जात नसल्याची माहिती वीजवितरण कंपनी ग्रामीण उपविभागाचे सहायक अभियंता कोरडे यांनी दिली.
तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढत असून, त्यावर योग्य नियंत्रण मिळविण्याचा तसेच ग्रामस्थांचे योग्य प्रबोधन करून त्यांना साथ रोगाविषयी माहिती दिली जात आहे. दरम्यान, डेंग्यूबाबत प्रबोधन व माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी गावडे यांनी सांगितले.
बैठकीत प्रारंभी डेंग्यूबाबत आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ३१ डेंग्यू सदृश रुग्णांपैकी चार रुग्ण डेंग्यूचेच असल्याचे तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.
डेंग्यू नियंत्रणाबाबत सर्व उपाययोजना प्रभावीरीतीने राबविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या असल्याचे तालुका आरोग्यधिकारी डॉ. विजय पोटे यांनी सभागृहात सांगितले.
शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या ८५ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडल्याने वाहनचालक व प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असल्याबद्दल सभागृहात तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी हे काम चौपदरीकरणासाठी जमीन उपलब्ध नसल्याने वेळेत होऊ शकले नाही. दरम्यान, कामाची मुदत संपल्याने ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवल्याचे निदर्शनास आणून देत रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी शासनाने अन्य ठेकेदारामार्फत काम सुरू केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाला दिली. इतर अनेक विभागांचा आढाव घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी गावडे यांनी स्वागत केल्यानंतर शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.
सुनंदा दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

बैठकीतील माहिती लोकांपर्यंत नाही...
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत होणारी चर्चा, सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांची माहिती. तसेच विविध शासकीय यंत्रणांद्वारे तालुक्यात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती वृत्तपत्राद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी या मासिक बैठकीत स्थानिक पत्रकारांना निमंत्रित करण्याची पद्धत बंद केल्याने बैठकीत काय निर्णय झाले, याची माहिती ग्रामस्थांपर्यत पोहोचत नसल्याबद्दल तालुक्यात एक चर्चेचा विषय झाला आहे.
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती या ठिकाणच्या सभा बैठकांना पत्रकारांना निमंत्रित करण्याची पद्धत स्वीकारण्यात आली. त्याद्वारे पारदर्शी कारभाराची ग्वाही दिली गेली. मात्र, फलटण पंचायत समिती पत्रकारांना जाणीवपूर्वक बैठकीत निमंत्रित न करता कोणता कारभार जनतेपासून लपविण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल फलटण तालुक्यातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Heavy air traffic on the electricity company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.