हापूस हंगाम उरला आठवडाभरच....
By Admin | Updated: May 25, 2014 00:33 IST2014-05-25T00:25:50+5:302014-05-25T00:33:02+5:30
दर कमी : एकाच दिवशी पावणेतीन लाख पेट्यांनी कोसळला हापूसचा दर

हापूस हंगाम उरला आठवडाभरच....
प्रकाश वराडकर, रत्नागिरी : अवघ्या काही दिवसात कोकण, मुंबईसह राज्यभरात स्वस्ताईचा झिम्मा खेळणारा हापूस यंदाच्या हंगामाचा या आठवड्यातच निरोप घेणार आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत हापूस हंगाम संपणार आहे. यंदा मुंबईत लोकसभा निवडणूक २४ एप्रिलला झाल्यानंतरच्या सुटीमुळे २८ एप्रिलला साचलेला २ लाख ६७ हजार पेट्या हापूस एकदम वाशी बाजारात दाखल झाला. एवढा हापूस विकण्याची वाशी मार्केटची क्षमता नसल्यानेच हापूसचा भाव कोसळला, असे मत प्रसिध्द आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील हापूसवर या ना त्या कारणाने संकटे येत आहेत. त्याचा परिणाम हापूसचे दर कोसळण्यात होत आहे. २०११ साली वाहतूक व्यावसायिकांचा संप, २०१२ साली माथाडी कामगारांचा संप, २०१३ साली एलबीटीचा प्रश्न व यंदा हापूस पीक कमी असूनही अचानकपणे वाढलेल्या तापमानाने हापूस एकाचवेळी तयार झाला व भाव कोसळले. रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे येथे १६, १७ एप्रिलला चक्रीवात निर्माण होऊन झालेले नुकसान व त्यानंतर पुन्हा उत्तर रत्नागिरीत वादळाचा तडाखा बसून झालेले नुकसान यामुळे धास्तावलेल्या आंबा बागायतदारांमध्ये हापूसची लवकर काढणी करून तो बाजारपेठेत पाठविण्याची स्पर्धा लागली. कोकणात यंदा मूळातच हापूस पीक ३० टक्केपर्यंत म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत कमी होते. २० एप्रिल २०१४ ते १० मे २०१४ या २० दिवसांच्या काळात त्यातील २० टक्के हापूस बाजारात आला. मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने हापूसचे दर घसरले व हापूस बागायतदारांचे नुकसान झाले. आता काही टक्के उरलेला हापूस बाजारात जात असून हजार ते १२०० रुपये पेटीचा दर आहे. येत्या आठवड्यात हापूस हंगाम खर्या अर्थाने संपेल. त्यानंतर किरकोळ स्वरुपात हापूस बाजारात असू शकेल, असे डॉ. भिडे म्हणाले. पोलिसांकडून लूट... वाशी बाजारात हापूसचे दर कोसळल्यानंतर जिल्ह्यातील काही आंबा बागायतदार व व्यापार्यांनी मुंबईत थेट हापूस नेऊन विकण्याचे तंत्र अवलंबिले. मात्र वाशी पूल नाका येथे मुंबईला जाणार्या हापूस वाहतूकदारांकडून तब्बल हजार ते दीड हजार रुपये पोलिसांकडून उकळण्यात येत असल्याच्या वाहतूकदारांच्या तक्रारी आहेत. पुण्याला थेट जाणार्या हापूस वाहनांना कात्रज येथे अडवून पैसे घेतले जात होते. मात्र डॉ. भिडे यांनी सचिवालयापर्यंत हा प्रश्न नेल्याने ही लूट थांबली.