सहा महिन्यांमध्ये दीडशेजण ‘लेटकमर्स’...
By Admin | Updated: January 9, 2017 00:33 IST2017-01-09T00:33:58+5:302017-01-09T00:33:58+5:30
कऱ्हाड नगरपालिका : मुख्याधिकाऱ्यांकडून कारवाई; सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक गैरहजेरीचे प्रमाण

सहा महिन्यांमध्ये दीडशेजण ‘लेटकमर्स’...
कऱ्हाड : वेळेचे नियमीत पालन न केल्याप्रकरणी तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कऱ्हाड पालिकेतील ३६५ जणांपैकी १६७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा महिन्यांत जूनपासून नोव्हेंबरपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी ‘बिन पगारी, फुल्ल अधिकारी’ म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे, गुलाबपुष्प देत सत्कार करूनही कर्मचाऱ्यांमध्ये काहीच फरक पडलेला दिसून येत नाही.
कऱ्हाड पालिकेत यापूर्वी अनेक अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी पालिकेतील इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेबाबत व कामाबाबत शिस्तही लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षभरापूर्वी रूजू झालेले मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या कामाबाबत शिस्त व नियमांची चांगली सवय लावण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे.
कारण अनेकवेळा कामावर उशिरा येणे, कामात कसूर करणे, नागरिकांनी मागितलेली माहिती वेळेवर न देणे अशा प्रकारांमुळे अनेक कर्मचारी चौकशीच्या अडचणीत सापडलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. सहा महिन्यांत १६७ जणांच्या पगारात कपात करण्यात आली
आहे.
कऱ्हाड पालिकेत सुमारे पंचवीस विभागात एकूण साडेतीनशे कर्मचारी काम करतात. यामध्ये नगर अभियंता, जलअभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य अभियंता, लेखापाल, अन्ननिरीक्षक, आरोग्य अधिकारी, करवसुली, सहायक खरेदी पर्यवेक्षक, समाजकल्याण अधिकारी, ग्रंथपाल, आस्थापना अशा विभागांचा समावेश आहे.
पालिकेत उशिरा येणाऱ्यांना वेळेबाबत भान राहावे तसेच त्यांना योग्य शासन मिळावे म्हणून कार्यालयीन वेळेत उशिरा येणाऱ्यांना गुलाबपुष्प देत त्यांच्यात परिवर्तन घडविण्याचा अनोखा उपक्रमही राबविला आहे. त्याचा काही प्रमाणात कर्मचाऱ्यावर परिणामही जाणवलेला दिसून आला. मात्र, ‘ये रे माझ्या मागल्या’ याप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून पुन्हा दांडी मारण्याचे प्रकार केले जाऊ लागले. त्यांच्यावर योग्य कारवाईही करण्यात आली.
वास्तविक, शासकीय कामाच्यावेळी उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला दंड करणे तसेच शिक्षा करणे याबाबत कायद्यातही तरतूद आहे. ती म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ नुसार जो शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी विनापरवानगी उशिरा आल्यास तसेच गैरहजर राहिल्यास त्याचे एक दिवसाचे वेतन कपात करणे होय.
तसेच सलग दोन दिवस उशिरा आल्यास त्यांना कामाच्या दर्जाबाबत पत्रही दिले जाते. त्याचा वापरही कऱ्हाड पालिकेत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे.
सध्या मात्र, वेळेबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पालिकेत वेळेपूर्वी उपस्थिती लावली जात आहे. त्यांच्यात काहीशा प्रमाणात बदलही घडला आहे. शाळेत बोलले जाणारे राष्ट्रगीत कर्मचारी आता पालिकेत आल्यावर म्हणू लागले आहेत.
कऱ्हाड नगरपालिकेत उशिरा येणाऱ्या व नियमित काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीची सवय लागावी म्हणून पालिकेतील सुमारे ३८८ कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतला
आहे.
त्याला नुकतेच वर्ष झाले आहे. वर्षभरात कर्मचाऱ्यांना मशीनचा वापर करणे समजू लागले असून त्यांच्यात वेळेबाबत गांभीर्यही पाळले जात
आहे. (प्रतिनिधी)