पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
By Admin | Updated: April 27, 2016 00:54 IST2016-04-26T23:39:19+5:302016-04-27T00:54:54+5:30
भारिपचा इशारा : दिसतील तिथे घेराव घालणार; दुष्काळप्रश्नावरून संतप्त वातावरण

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
सातारा : जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असताना पालकमंत्री विजय शिवतारे यांना त्याचे गांभीर्य नाही. त्यांनी उपाययोजना करण्याच्या हालचाली केल्या नाहीत. तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील वाई, जावळी, पाटण, सातारा तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक गावांना दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्याचबरोबर खटाव, माण, खंडाळा या कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या भागांमध्ये आज पाण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, शासनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पालकमंत्री शिवतारे यांना याचे गांभीर्य नाही.
ते युवक आघाडीने आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते. या बैठकीत विविध तालुक्यांतून आलेल्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन सरकारला जाब विचारण्याचा निश्चय केला आहे.
भारिप युवक आघाडीच्या वतीने शिवतारे जेथे सापडतील तेथे त्यांना घेराव घालून याबद्दल जाब विचारणार आहे, अशी माहिती सूरज गायकवाड, संतोष उघडे, बाळासाहेब कांबळे, दीपक सोनवणे, संतोष अंडागळे, अक्षय साळवी, मनोज गायकवाड, अक्षय भोसले आदी विविध तालुका युवा अध्यक्षांनी दिली. या बैठकीस मयुर गायकवाड, अनिल वानखेडे, आकाश भोसले, कमलाकर खंडागळे, संजय खंडागळे, सुमित उघडे, अजित कांबळे, रोहित रणबागले, जयवंत रणबागले, गोरक्षनाथ माने, विक्रम माने, अजय भोसले, संतोष कांबळे, प्रदीप कांबळे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश वाघमारे यांनी मानले. (प्रतिनिधी)