चकचकीत रस्त्यावरही ‘छान-छान खड्डे’
By Admin | Updated: May 14, 2015 00:29 IST2015-05-13T22:03:26+5:302015-05-14T00:29:20+5:30
माची पेठेजवळील स्थिती : पाण्याचे व्हॉल्व्ह उघड्या अवस्थेत; खड्ड्यामुळे पादचाऱ्यांपुढेही संकट

चकचकीत रस्त्यावरही ‘छान-छान खड्डे’
सातारा : माचीपेठेतून शनिवार पेठेकडे येणाऱ्या मार्गावर पालिकेच्या वतीने डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या उतारावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्ह उघड्या अवस्थेत आहे. या व्हॉल्व्हमुळे रस्त्यात सुमारे एक फूट लांबीचे खड्डे पडले असून, नवीन डांबरीकरणाने हे खड्डे अधिकच खोल झाले आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस पडत नसल्याने दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना वाढत चालल्या आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या वतीने डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, माची पेठेतूून शनिवार पेठेकडे येणाऱ्या तीव्र उतारावर असणारे खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पाण्याचे व्हॉल्व्ह आहे. हे व्हॉल्व्ह नेहमी सुरू केले जातात. यानंतरच परिसरात पाणीपुरवठा होतो.
तीव्र उतार असल्यामुळे काही वाहनधारकांच्या रस्त्यात असणारे हे खड्डे नजरेस पडत नाही. त्यामुळे अनेकदा दुचाकी या खड्ड्यांमध्ये आदळते. काही वेळेस नियंत्रण न राहिल्याने दुचाकीस्वार घसरून जखमीही झाले आहेत. डांबरीकणापूर्वी या खड्ड्यांची उंची कमी होती. मात्र, नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने या खड्ड्यांची उंची आणखीनच वाढली आहे. त्यामुळे दुचाकीधारकांबरोच या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस पडत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने या खड्ड्यांवर लोखंडी अच्छादन लावून वाहतुकीस येणारे अडथळे दूर करावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यात असणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनधारकांबरोबरच नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. दिवसा धोका नाही मात्र रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना जर हा खड्डा दिसला नाही, तर गंभीर इजा होवू शकते. त्यामुळे या खड्ड्याची लवकर डागडूजी करणे गरजेचे आहे.
- अमोल बाबर, नागरिक
असाही तात्पुरता उपाय
येथे असणाऱ्या एका खड्ड्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपायोजना म्हणून दगडी टाकण्यात आली आहे. व्हॉल्व्ह सुरू करण्यापूर्वी ही दगडी काढली जातात व बंद करताना पुन्हा दगडी टाकून खड्डा बंदिस्त केला जातो. तात्पुरता उपाय करण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.
माचीपेठेतून शनिवार पेठेत प्रवेश करतानाच तीव्र उतारावर तीन खड्डे आहेत. हे खड्डे रात्रीच्या वेळी नजरेस पडत नाही. त्यामुळे दुचाकी अचानक खड्ड्यात जाऊन आदळते. प्रशासनाने या खड्ड्यांवर अच्छादन टाकणे गरजेचे आहे.
- आनंद शेंडे, वाहनचालक