लोकसभा, विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची

By Admin | Updated: April 26, 2016 00:27 IST2016-04-25T23:03:14+5:302016-04-26T00:27:44+5:30

पंकजा मुंडे : ‘ग्राम उदय से भारत उदय’ अंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात

The Gram Sabha is important as the Lok Sabha and Vidhan Sabha | लोकसभा, विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची

लोकसभा, विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची

दहिवडी : ‘लोकसभा आणि विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची असून, सलग चार वेळा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या लोधवडेचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा,’ असे आवाहन ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
माण तालुक्यातील लोधवडे येथे ‘ग्राम उदय से भारत उदय’ अंतर्गत तेथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री मुंडे बोलत होत्या. या ग्रामसभेला जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जावेद शेख, कार्यकारी अभियंता दिलीप पालवे, गटविकास अधिकारी सीमा जगताप, सरपंच अर्पणा नष्टे, उपसरपंच मंदाकिनी कदम, सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘ग्रामसभेला लोकशाहीमध्ये फार महत्त्व आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्या लोधवडे गावात बागायती शेती होत आहे, ही बाब अन्य गावांना प्रेरणा देणारी आहे. सगळ्या निवडणुकीत ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वात अवघड असते. सलग चारवेळा लोधवडे गावाने बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही हा आदर्श घेऊन आपल्या गावाचा विकास करावा. ’
गावे जलयुक्त करण्यासाठी सर्व गावांनी सहभाग द्यावा, असे आवाहन सचिव देशमुख यांनी यावेळी केले. सभेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर गटविकास अधिकारी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर दादासो चोपडे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय पंचायत राज दिनाची शपथ दिली. तसेच सभेचे विषयवाचन केले.
यावेळी सुकन्या योजनेंतर्गत मुलींच्या नावे १ हजार रुपयांच्या मुदत ठेव पत्राचे वाटप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या ग्रामसभेत राष्ट्रीय पंचातय राज दिनावेळी घ्यावयाची शपथ, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामसभेमध्ये शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे वाचन, राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्त्व आणि ७३ व्या घटनादुरुस्तीने पंचायत संस्थांमध्ये झालेले बदल, १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधींच्या खर्चाचे नियोजन ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे, स्त्री भ्रूणहत्या, कुपोषण निर्मूलन, महिलांचा सहभाग, ग्रामविकासामध्ये योगदान, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी व अन्य विकास योजनांची अंमलबजावणी सन २०१६-२०१७ साठी पाणी व पीक पद्धती ठरविणे आदी विषयांवर चर्चा करून मंजूर करण्यात आले.
या ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी नरेंद्र जगदाळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Gram Sabha is important as the Lok Sabha and Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.