ग्रामपंचायतींनी पाणीसाठ्याचे नियोजन करावे
By Admin | Updated: November 27, 2015 00:15 IST2015-11-26T21:08:04+5:302015-11-27T00:15:30+5:30
दीपक चव्हाण : टंचाई आढावा बैठकीत फलटण तालुक्यातील गावांचा घेतला आढावा

ग्रामपंचायतींनी पाणीसाठ्याचे नियोजन करावे
फलटण : ‘तालुक्यातील ग्रामपंचायतीनीं आपल्या गावासाठी आणि आगामी सहा महिन्यांच्या काळात या धरणातील मर्यादित पाणीसाठ्यांची स्थिती याचा विचार करून प्रत्येक ग्रामपंचायतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून टंचाई कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती यांच्या संयुक्त विभागाने जिल्हा बँकेच्या येथील विभागीय कार्यालय सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, कृषी सभापती अमित कदम, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, अशोक सस्ते, गटविकास अधिकारी नीलेश काळे उपस्थीत होते.सोनवलकर म्हणाले, ‘नेहमी फेब्रुवारी, मार्चमध्ये उपलब्ध पाणीसाठ्यांची माहिती घेऊन आगामी काळीतील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले नाही. त्यामुळे तलाव, पाझर तलाव, ओढे कोरडे राहिले. जवळपास सर्वत्र पाणीटंचाई गंभीर झाली. या परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याच्या वापराचे योग्य नियोजन करून आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत टॅकरशिवाय पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अंतिम उपाय म्हणून टँकर सुरू करण्यात येणार आहे.’जिंती ग्रामपंचायतीने क्षारयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने नीरा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने नीरा उजव्या कालव्यावरून जिंतीसह परिसरातील चार-पाच गावांसाठी एक योजना करण्याची मागणी केली. कोळकीचे सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी प्रादेशिक योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेने वीजबिलांपैकी काही निधी करून दिली पाहिजे. वाठार निंबाळकर ग्रामपंचायतीने ढवळ प्रादेशिक योजना परिसरातील चार-पाच ग्रामपंचायतींद्वारे चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सोमंथळी ग्रामपंचायतीची विंधनविहीर सांगवी ग्रामपंचायत हद्दीत असून, सोमंथळीला अन्य योजनेतून पाणी उपलब्ध झाल्याने या विंधन विहिरीचे पाणी सांगवीसाठी उपलब्ध करून दिले होते. सोमंथळीत पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या विंधन विहिरीचे पाणी सोमंथळीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. (प्रतिनिधी)
हातपंप दुरुस्तीचा निर्णय
तालुक्यातील ९० ते ९५ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गावाचे उपलब्ध पाणीसाठे, पाणीपुरवठा योजनांची स्थिती यांचा आढावा सुरुवातीला घेण्यात आला. यात पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती देखभाल, विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे उभी आडवी कूपनलिका घेणे, हातपंपाची दुरुस्ती या उपाययोजना संबंधित अधिकाऱ्याद्वारे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.