‘संग्राम’ योजनेची ग्रामपंचायतींना डोकेदुखी

By Admin | Updated: July 31, 2014 23:27 IST2014-07-31T21:04:11+5:302014-07-31T23:27:08+5:30

अपुरी यंत्रणा : डोंगरपठारावरील गावांची गैरसोय

Gram Panchayats get frustrated with 'Sangram' scheme | ‘संग्राम’ योजनेची ग्रामपंचायतींना डोकेदुखी

‘संग्राम’ योजनेची ग्रामपंचायतींना डोकेदुखी

ढेबेवाडी : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींच्या आधुनिकीकरणासाठी करोडो रुपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर टाकला़ पारदर्शकता आणि तातडीची सेवा हा शासनाचा या मागचा उद्देश असला, तरी सुद्धा अपुऱ्या यंत्रणेमुळे डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम’ म्हणजे डोके दुखी बनली आहे़ यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयातच हातोहात मिळणाऱ्या दाखल्यांसाठी वीस किलोमीटरच्या पायपिटीसह दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने शासनाने सोय केली की गैरसोय, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़
ग्रामविकासाच्या संकल्पनेत ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने अलीकडे काही वर्षांत आमूलाग्र बदल करत ग्रामपंचायतींनाच जादा अधिकार देऊ केले आहेत़ ग्रामपंचायतींच्या कारभारात १ ते २७ नमुन्यांंना महत्त्व असूनही जन्म-मृत्यू, मिळकतीचे उतारे, विवाह नोंदी याच बाबींकडे प्रामुख्याने ‘अण्णासाहेब’ लक्ष देत होते़ इतर नमुन्यातील माहिती वर्षांनुवर्षे दुर्लक्षित केली जात असे़ शासनाने राज्यातील सुमारे २७ हजार ग्रामपंचायतींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला़ प्रत्येक ग्रामपंचायत संगणकीकृत करून स्वतंत्र ‘संग्राम’ कक्षाची निर्मिती केली़ त्यासाठी संपूर्ण यंत्रणा आणि संगणक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली़ राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेसच्या दिशेने चालू झाला आहे़
तर डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ निर्माण झाला़ संगणकतज्ज्ञ कर्मचारी मिळाला; पण याठिकाणी दूरध्वनी अथवा इतर कंपन्यांचे नेटवर्कच नसल्याने आॅनलाइन काम करायचं कसं ? असा प्रश्न पडला असून नेटवर्कअभावी संग्रामचे काम ठप्प आहे़ ग्रामपंचातींचा संपूर्ण कारभार आॅनलाइन करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा होऊ लागल्याने तर दुसरीकडे नेटवर्क नसल्याने मेटाकुटीस आलेल्या ग्रामसेवकांनी अखेर अन्य गावातून ‘संग्राम’चे कामकाज चालू केले आहे़ दरम्यान, यामुळे ग्रामस्थांची तर गैरसोय होतच आहे़, शिवाय संबंधित ग्रामसेवकांच्या खिशाला चाट लागत आहे़ (वार्ताहर)

ग्रामपंचायत गावात, संग्राम कक्ष परगावात
---ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावरील पळशी, पाणेरी, सातर, कारळे, कसणी आदी गावांत दूरध्वनी यंत्रणा अखंडित नसल्याने या गावांत ग्रामपंचायती असूनही संग्राम कक्ष ढेबेवाडी येथे सुरू करावा लागल्याने ग्रामस्थांची अडचण तर ग्रामसेवकांचा लोढणा झाला आहे़
----या विभागात कायमस्वरूपी संपर्क यंत्रणा कार्यान्वित व्हावी, जनतेची अडचण दूर व्हावी, यासाठी दूरसंचार विभागाकडे येथील मध्यवर्ती ठिकाणी टॉवर उभारावा, अशी अनेकदा मागणी केली़ त्यासाठी अपेक्षित जागा देण्याचीही व्यवस्था स्वत: केली आहे़; पण दूरसंचार विभाग दखल घेत नाही़
-हणमंतराव साळुंखे

Web Title: Gram Panchayats get frustrated with 'Sangram' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.