कोरेगावातील शासकीय जागा नगरपंचायतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST2021-02-26T04:54:48+5:302021-02-26T04:54:48+5:30
हस्तांतरित करा : शशिकांत शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : ‘कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येत असून, नगरपंचायतीस ...

कोरेगावातील शासकीय जागा नगरपंचायतीकडे
हस्तांतरित करा : शशिकांत शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : ‘कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येत
असून, नगरपंचायतीस आवश्यक असलेल्या शासकीय जमिनी नगरपंचायतीकडे हस्तांतरित केल्या जाव्यात, त्यासाठी सादर करण्यात आलेला प्रस्ताव
पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत’, अशा
सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी
दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेगाव नगरपंचायतीच्या प्रलंबित
प्रश्नांसंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी
उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, मुख्याधिकारी
विजया घाडगे यांच्यासह नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्षा मंदा
बर्गे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, ‘केवळ जागा मिळत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन
प्रकल्प उभारणी रखडली आहे, त्यासाठी प्रशासनाने शासकीय जागा उपलब्ध करून
देणे आवश्यक आहे. शहरातील व्यापारीसंकुल, भाजी मंडई व सुसज्ज वाहनतळ
उभारणीसाठी आझाद चौक व साखळी पुलानजीकच्या शासकीय जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित कराव्यात. हुतात्मा स्मारक परिसराची देखभाल व दुरुस्ती होणे
आवश्यक असून, ही जागादेखील नगरपंचायतीकडे वर्ग होणे गरजेचे आहे,
त्यामुळे प्रशासनाने याबाबत नगरपंचायतीने सादर केलेल्या प्रस्तावांवर
तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आ. शिंदे यांनी केली.
शांतीनगर उपनगरामध्ये रस्ता व भुयारी गटारे होणे गरजेचे असून, मॅफको कंपनीच्या जागेवर उभ्या राहत असलेल्या प्रशासकीय इमारत परिसरातून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना आ. शिंदे यांनी दिल्या.
रामचंद्र शिंदे, सुनील थोरवे, ज्योती पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचा
आढावा घेऊन, ज्या त्रुटी आहेत, त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना
दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक संजय पिसाळ, बच्चूशेठ ओसवाल,
नागेश कांबळे, किशोर बर्गे, नवनाथ बर्गे, महादेव जाधव व अमरसिंह बर्गे
यांनी भाग घेतला.