शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन

By Admin | Updated: August 18, 2015 22:35 IST2015-08-18T22:35:47+5:302015-08-18T22:35:47+5:30

पृथ्वीराज चव्हाण : मोदी सरकारकडून जनतेची केवळ निराशाच

Government disappointed about farmers' questions | शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन

कऱ्हाड : भ्रष्टाचारी अन् बोगस पदवीधारक मंत्र्यांबाबत सरकारमधील कोणीच बोलायला तयार नाही, तर दुष्काळ अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य आणि कें द्रातील सरकार उदासिन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी शिक्षण क्षेत्रात येत असलेल्या भगवीकरणाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली.यावेळी एनएसयआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदि उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, भाजप सरकारकडून अनेक विकासाच्या, योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. भाजपकडून गंगा नदी शुद्धीकरण केली जात आहे. तर मग कृष्णा आणि यमुना नदी का शुद्ध केल्या जात नाहीत. भाजप सरकारकडून भावनिक राजकारण केले जात आहे.राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न, फळबाग- कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर संकट आले आहे. शेतकऱ्यांच्या संकटाबाबत मात्र केंद्र सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अजूनही दुष्काळी भागात राज्य सरकारकडून जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. दिवसेंदिवस जलाशयांची स्थिती बिकट होत चालली आहे. मात्र, सरकारकडून ठोस पावले उचलली नाही.शेतकऱ्यांवर आलेले दुहेरी संकट दूर करण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी अधिवेशनात सरकाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत तसेच अनेक मागण्यांबाबत बुधवारी मुंबई येथे मंत्रालयावर एनएसयुआय मोर्चा काढणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)


केंद्रीय मंत्री अन् राज्यातील शिक्षणमंत्रीही बोगस डिग्रीचे
मोदी सरकार केंद्रातील मंत्रिमंडळातही बोगस मंत्री आहेत, तसेच राज्यातील शिक्षणमंत्रीही बोगस डिग्रीचे असल्याने याबाबत आश्चर्यच वाटते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, ‘मी शिक्षण घेतलेल्या विद्यापीठात आजही पैसे भरूनही प्रवेश मिळत नाही. त्यांनी ज्या विद्यापीठात शिक्षण घेतले आहे, त्या विद्यालयाला डिग्री देण्याचा अधिकार नाही.’
पुरंदरेंना पुरस्कारासाठी सरकारने विवेकबुद्धी वापरावी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी सद्सदविवेकबुद्धी वापरणे गरजेचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा निर्मितीत लोकसंख्या महत्त्वाची
युती सरकार हे २२ जिल्ह्यांची निर्मिती करणार असल्याचे समजले, त्याबाबत घोषणाही करण्यात आल्या. मात्र, जिल्ह्याची घोषणा व निर्मिती करण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत. जिल्हा विभाजन करताना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या तसेच तेथील विकास या गोष्टी महत्वाच्या असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Government disappointed about farmers' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.